हैदराबाद : महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगत डाव्या विचारसरणीचे कवी आणि लेखक वरवरा राव यांनी माझा लढा फॅसिस्ट धोरणांविरुद्ध आहे. त्याला षड्यंत्र म्हणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.
आमच्याविरुद्ध हा खोटा गुन्हा आहे. जर फॅसिस्ट धोरणांविरुद्धच्या लढ्याला कट संबोधले गेले, तर या कटाविरुद्ध लढणे यापेक्षा मोठे षड्यंत्र होऊ शकत नाही, असे राव यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे पोलिसांनी आज सकाळी राव यांना येथे आणले असताना विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला नजरकैदेत ठेवण्यास सांगितले आहे. आमच्या म्हणण्यानुसार आमच्याविरुद्ध हा खोटा गुन्हा आहे. कोरेगाव भीमाप्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा, असेही राव म्हणाले.
राव यांच्या पत्नी हेमलता यांनी दिलेल्या माहितीनुसार, राव यांना कोणालाही भेटू देण्यात आले नाही. राव यांच्या वकिलानेही तेलंगणा पोलिसांनी त्यांच्या वकिलालाही त्यांना भेटू दिले नसल्याचे सांगितले.
वरवरा राव यांच्याशिवाय वेर्नोन गोन्झाल्विस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा या मानवाधिकार कार्यकर्त्यांनाही नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सर्वांना मंगळवारी (ता. 28) देशाच्या विविध भागांतून अटक करण्यात आली होती.
वरवरा राव नजरकैदेत
तेलंगणाचे पोलिस उपायुक्त (मध्य विभाग) विश्व प्रसाद यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वरवरा राव यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत ते नजरकैदेत आहेत, तोपर्यंत त्यांना कुणालाही भेटू देण्याची किंवा सार्वजनिकरीत्या बाहेर येण्याची परवानगी नाही. केवळ त्यांची पत्नी आणि मुलांना घरात राहता येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.