prakash ambedkar
prakash ambedkar  esakal
देश

Prakash Ambedkar : घराणेशाही मोडणे हीच ‘वंचित’ची भूमिका

दीपा कदम deepakadam3@gmail.com

नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी, असा आमचा प्रयत्न होता. पण दुर्देवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे होती तशी ती होत नव्हती. विविध संघटनांशी बोलून दोन एप्रिलपर्यंत भाजपच्या विरोधात मजबूत तिसरी मजबूत आघाडी उभी राहील. ‘वंचित’सोबत येण्यास अनेक संघटना इच्छुक आहेत. त्यामध्ये मराठा, ओबीसी, लिंगायत अशा संघटना असल्याची माहिती ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

प्रश्नः तुम्हाला कशा प्रकारची आघाडी अपेक्षित होती?

आंबेडकर :सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या विरोधात लढण्याची आघाडीची तयारी असली पाहिजे. आघाडीमध्ये घराणेशाहीला थारा नसेल. आघाडीत सामाजिक वंचित, दलित, ओबीसी, शेतकरी, महिला आणि अल्पसंख्यांकाना स्थान असले पाहिजे. सात पिढ्यांनी सत्ता पाहिली नाही, अशांना संधी मिळायला सत्तेचा वाटा मिळायला पाहिजे. ऊस, कापसाचे दर या बाबतीच भूमिका ठाम असायला हवी. सरकारी कर्मचार्यांचे आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर त्या आघाडीची ठोस भूमिका असायला हवी.

प्रश्नः २०१९ प्रमाणे आताही (२०२४) महाविकास आघाडीसोबत जाण्याचा तुमचा इरादा नव्हता, अशी तुमच्याबाबत सर्वत्र चर्चा आहे.

आंबेडकर :तसे असते तर आम्ही वर्षभरापूर्वीच शिवसेना ठाकरेंसोबत युती केली नसती. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीसोबत येण्याची आम्हाला इच्छा आहे, असे आम्ही जाहीरपणे सांगितले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले. राहुल गांधी यांनी राजगृहावर यावे, यासाठीही त्यांना निमंत्रित केले होते. महाविकास आघाडीचा आम्ही भाग असावे, यासाठी आमच्याकडून आम्ही काही कमी ठेवले नाही. मात्र एका टप्प्यावर आम्हाला लक्षात आले की या पक्षांना घराणेशाही शाबूत ठेवण्यात स्वारस्य आहे. राजकारणातली घराणेशाही मोडणे ही वंचितची भूमिका आहे. महाविकास आघाडीला आम्हाला सहभागी करुन घ्यायचे नव्हते. आमच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे ते बाहेर सांगत होते, प्रत्यक्षात आम्ही त्यांच्या चर्चेचा भागच कधीच नव्हतो.

प्रश्नः महाविकास आघाडीमध्ये तुम्ही यावे, अशी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भूमिका होती, पण नेमके अडले कुठे?

आंबेडकर : खरेतर शिवसेनेसोबत आमची युती वर्षभरापूर्वी झाली होती. महाविकास आघाडीसोबत आपण एकत्र चर्चा करु, सभा एकत्र घेऊ, असा प्रस्ताव मी उध्दव ठाकरेंना सुचवला होता. पण त्यांनी ते काही ऐकले नाही. आम्हाला वगळूनच त्यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चा केली. काँग्रेसची भूमिका सकारात्मक होती. त्यामुळे आघाडीचे काही ठरत नसेल तर आपण दोघे आघाडी करु, असा पर्यायही मी त्यांना दिला होता. महाविकास आघाडीचे जागा वाटपावरुन टोकाचे वाद आहेत, हे मला दिसत होते. परिणामी महाविकास आघाडीचे आज काय होऊन बसलेय पहा. त्यामुळे मला त्यांच्या भांडणात पडायचे नव्हते. आघाडीचे जे व्हायचे ते होणार आहे, पण माझ्या डोक्यावर त्याचे खापर मला फोडून घ्यायचे नव्हते.

प्रश्नः २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’मुळे काँग्रेसचे नऊ उमेदवार पडले.

आंबेडकर : काँग्रेसमुळे आमचे उमेदवार विजयी होता होता राहिले, असा विचार तुम्ही का करत नाही. ‘वंचित’चे उमेदवार पडावेत अशाच पध्दतीने काँग्रेसने उमेदवार दिले होते. अकोलामध्ये काँग्रसने मुस्लिम उमेदवार दिला होता. त्यामुळे माझा पराभव झाला. ‘वंचित’ हा तिसरा नव्हे तर प्रथम पर्याय असायला पाहिजे, या दिशेने ‘वंचित’ चालला आहे.

प्रश्नः काँग्रेसला तुम्ही दोन जागांवर पाठिंबा दिला आहे, त्यामागचे रहस्य काय?

आंबेडकर : कोल्हापूर आणि नागपूर या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पाठिंबा असेल. कोल्हापूरला शाहू महाराजांना पाठिंबा देण्यामागचे कारण व्यक्तिगत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचे घनिष्ठ संबंध होते, ते कसे विसरता येतील. पंधरा दिवसांपूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मी त्यांनी कुठल्याही सात जागा सांगाव्यात, तिथे मी त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे.

प्रश्नः २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला मिळालेल्या मतांची टक्केवारी सात टक्क्यांवरुन तीन टक्क्यांपेक्षा कमी झाली होती. त्यावेळी तुमची ‘एमआयएम’सोबत युती होती. या निवडणुकीत ती नाही. त्यमुळे यंदाच्या निवडणुकीत ती टक्केवारी अजून कमी होण्याची शक्यता आहे.

आंबेडकर : अजिबात नाही. २०१९ मध्ये आमचा पक्ष नवीन होता. पक्षाची तळागाळापर्यंत बांधणी व्हायची होती. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आमची संपूर्ण राज्यात समाधानकारक बांधणी झालेली आहे. २७ लोकसभा मतदारसंघ आम्ही स्वतंत्रपणे लढवू शकतो. तेव्हा ‘एमआयएम’ आमच्यासोबत होती. ‘एमआयएम’ला ‘वंचित’ची मते मिळाली. मात्र ‘वंचित’ला ‘एमआयएम’ची मते मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या उमेदवारांचा विजय होता होता राहिला. राज्यात आमच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या बांधणीमुळे १५ टक्क्यांपेक्षाही अधिक मते ‘वंचित’ला मिळतील.

प्रश्नः अकोला लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. १९८० दरम्यान अकोला तुम्ही बांधायला घेतलात आणि नंतर त्याच्याकडे अकोला पॅटर्न म्हणून पाहिले जावू लागेल. तेव्हाचे प्रश्न अजूनही कायम आहेत का?

आंबेडकर : वेगळ्या विदर्भाची मागणी मी तेव्हाही केली होती, ती आजही कायम आहे. छोट्या राज्यांचा विकास अधिक नियोजनबध्द करता येतो, असे माझे मत आहे. उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि गोवा या छोट्या राज्यांचा खूप कमी काळात चांगला विकास झालेला आहे. राजकीयदृष्ट्या छोटी राज्ये अस्थिर असतात, पण आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या ती सक्षम असतात. विदर्भात शेतकर्यांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही, हे प्रश्न अजूनही कायम आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील घराणेशाही संपावी, यासाठीचा माझा लढा सुरुच राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT