'आम्ही पक्षश्रेष्ठींना काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींबाबत एक गुप्त पत्र दिलं होतं; पण..'
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यात काँग्रेसला (Congress) म्हणावं असं यश प्राप्त झालं नाही. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली असून निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालाय. या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळं पक्षाचा पराभव झाल्याचं म्हंटलंय.
चव्हाण पुढे म्हणाले, आम्ही पक्षश्रेष्ठींना काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींबाबत एक गुप्त पत्र दिलं होतं. त्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर आम्हाला वेळ मिळाली. आम्ही त्यातही मतं मांडली; पण पुढं काहीच झालं नाही. त्यामुळं अंतर्गत कलह आणि चुकीचे निर्णय या पराभवाला कारणीभूत आहेत, असं माझं ठाम मत आहे. गोवा, उत्तराखंड, पंजाब येथील काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींमुळंच पक्षाचा पराभव झालाय.
एकट्या प्रियंका गांधींच्या (Priyanka Gandhi) जोडीला संपूर्ण काँग्रेसनं उभं राहायला पाहिजे होतं. पण, सोनिया गांधी (Sonia Gandhi) प्रचाराला गेल्या नाहीत. पाच राज्यात निवडणुका होत्या. त्यामुळं काँग्रेसनं यात झोकून द्यायला हवं होतं. पण, तसं काहीच झालं नाही, याचा फटका पक्षाला बसलाय. मात्र, काहीही झालं तरी 'आप' काँग्रेसची जागा घेऊ शकत नाही. आप (Aam Aadmi Party) काँग्रेसला पर्याय होऊ शकत नाही, असं स्पष्ट मतही त्यांनी मांडलंय. तसेच आजच्या निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रातील सरकारवर होणार नाही, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.