Monday Column
Monday Column esakal
जळगाव

Jalgaon News : म्हणून मुख्यमंत्रिपदाला अन्‌ विकासाला मुकलो आपण !

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : समाजातील कुठल्याही क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी स्वत:चे रेष वाढवावी लागते. प्रतिस्पर्ध्याची रेष कमी करून आपली सिद्धता दिसत नाही. राजकारणातही हे लागू आहे. मात्र, आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना त्याची समज नसावी, ही शोकांतिका आहे. आपल्याकडे स्वत:चे चांगले सांगण्यासारखे नसले की आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो.

सध्या जिल्ह्यातील नेत्यांमधील चिखलफेक तेच दर्शवतेय. दुर्दैवाने या चिखलफेकीत धन्यता मानणाऱ्या नेत्यांना जिल्ह्यातील प्रश्‍न दिसत नाहीत आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे भविष्य अंधारात आहे.

खरंतर जळगाव जिल्ह्यातील नागरी सुविधांशी निगडित प्रश्‍न सुटलेले नाहीत. जिल्ह्याचे ठिकाण असूनही जळगाव शहराची अवस्था राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अक्षरश: खेड्याहूनही बेकार करून टाकलीय. अडीच वर्षांच्या मुदतीतील अमृत योजनेच्या कामाला सहा वर्षांनंतरही पूर्णत्व आलेले नाही. (Jalgaon Political Monday Column Article Jalgaon News)

पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे ग्रामीण पाणीपुरवठा खाते असूनही त्यांच्या धरणगावात १५ दिवसांआड पाणी येते. भुसावळचीही तीच स्थिती आहे. जळगावात ‘अमृत’चे पाणी मिळण्याची हमी द्यायला कुणी तयार नाही. विमानतळ नावाला झालेय. सेवा मात्र बंद आहे. काही सिंचन योजना झाल्या.

मात्र, त्यातून भूजल पातळी वाढण्यापलीकडे त्यांचा उपयोग थेट शेती, पिण्याच्या पाण्यासाठी झालेला नाही. एकही नवीन उद्योग आणण्याची जिल्ह्यातील कुण्या नेत्यात ‘धम्मक’ नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे हे विषय असताना त्या प्रश्‍नांवरून यंत्रणेला जाब विचारण्याची नेत्यांची हिंमत नाही. हिंमत असली तरी ती केवळ त्यांचा स्वार्थ साधण्यापुरत्या विषयांवरून यंत्रणेला वेठीस धरण्यापुरती मर्यादित आहे.

एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दिग्गज जळगाव जिल्ह्याच्या भल्यासाठी एकत्र आल्याचे एकही उदाहरण नाही. श्री. खडसे कसे आहेत, त्यांनी घरात कुणाला पदे दिली, श्री. महाजन कोण आहेत, त्यांचे काय चाललंय, गुलाबरावांची लाइन कोणती हे सर्वकाही जनतेला माहीत आहे. या नेत्यांनी स्वत:च्या राजकीय लाभासाठी एकमेकांची ‘बरी-वाईट’ ओळख करून देण्याची गरजच नाही. तरीही सर्व मर्यादा ओलांडून ही मंडळी केवळ राजकारण करत असेल, तर या जिल्ह्याला भविष्यच नाही आणि असले तरी ते केवळ अंध:कारमय आहे, असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

त्यामुळे खोदलेल्या रस्त्यांची अवस्था शेतरस्त्यांपेक्षाही वाईट झाली आहे. भुसावळ शहराची यापेक्षा वेगळी अवस्था नाही. औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरण, फागणे-तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे थंड बस्त्यातील काम कधी पूर्ण होणार, याची शाश्‍वती नाही.

राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांची खरंतर जळगाव जिल्ह्याला मोठी परंपरा आहे. मात्र, राजकीय वर्चस्वाच्या लढाईत आणि आपल्या क्षेत्राचा विकास करायचा या इच्छाशक्तीच्या अभावमुळेच जिल्ह्याचे वर्षानुवर्षे नुकसान होत गेले अन्‌ आजही होतेय, म्हणूनच क्षमता असूनही खानदेश मुख्यमंत्रिपदालाही मुकला अन्‌ विकासालाही.

एकवेळ संताप व्यक्त करून हे दु:ख पचवून घेईलही आपली जनता. मात्र, राजकीय वर्चस्वाच्या संघर्षात केवळ राजकीय द्वेषातून नैतिकता सोडून चिखलफेक करताना नेत्यांनी किमान मर्यादा पाळल्या नाहीत, तर त्यांना आताच्या व भविष्यातील पिढ्या कधीही माफ करणार नाहीत.

प्रतिक्रिया घ्या, पण...

अलीकडे एका नेत्याचे एखादे वक्तव्य आले, की लगेच दुसऱ्या नेत्यासमोर बूम धरत त्याचं मत जाणून घेण्याचा ‘अघोरी ट्रेंड’ पत्रकारितेत आलाय. सध्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांत जी चिखलफेक सुरू आहे, ती या ‘ट्रेंड’मधूनच जन्माला आलीय. ‘भाऊ ते असं बोलले’ यावर तुमची प्रतिक्रिया काय?, भाऊ तो असे म्हणाला, त्याकडे तुम्ही कसे पाहता?’ या पलीकडे या माध्यम प्रतिनिधींची पत्रकारिता दिसतच नाही. त्यातून बाहेर निघून पत्रकारांनीही शहर, जिल्ह्याचे प्रश्‍न मांडावेत. त्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT