पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी यावर निर्बंध आणणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हर्णे - नुकतीच शासनाने बंदी उठवल्याने कोकणात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. परंतु पर्यटकांची बेपर्वाई आणि अरेरावीचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काल कोकणात समुद्रकिनारी एक चारचाकी गाडी बुडताना वाचली. यामुळे पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी यावर निर्बंध आणणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी घेऊन पर्यटक थेट पाण्यात उतरले. सुरुवातीला वातावरण शांत होत. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी भरतीला सुरुवात झाली. थोड्या वेळात भरतीचे पाणी चढू लागले आणि गाडी पाण्यात बुडू लागली. गाडीचा चालक गाडी बाहेर काढायला गेला पण ती वाळूत रुतू लागली. यासाठी ट्रॅक्टर बोलवण्यात आला. तोपर्यंत गाडीचे टायर पाण्याखाली गेले होते. ट्रॅक्टर आल्यावर दोरखंडाच्या साहाय्याने ती गाडी बाहेर काढण्यात आली. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. परंतु पर्यटकांच्या या प्रसंगांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. प्रशासनाकडून सूचना फलक लिहिले असूनही याची दखल घेतली जात नाही. या बेपर्वाईमुळे मोठे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तेव्हा वेळीच स्थानिक प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने मिळून यावर कडक निर्बंध घालावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
"शनिवार-रविवार या दोन दिवशी दोन ते तीन पोलिस सकाळी व सायंकाळी या संपुर्ण बीचवर कडक लक्ष ठेवण्यासाठी द्यावेत, अशी मागणी दापोली पोलीस प्रशासनाकडे पत्राद्वारे करणार आहोत. यामुळे कोणतीही घडणाऱ्या घटना टाळता येणं शक्य होईल."
- महेश पवार, उपसरपंच हर्णे, गामपंचायत
या आहेत समस्या
- पाळंदे बीचवर पर्यटक खूप खोलवर पाण्यात जातात
- सुरक्षारक्षकांना दाद देत नाहीत
- होमगार्डलाही पर्यटक जुमानत नाहीत
- पुरुष पर्यटक अंतर्वस्त्रावरच फिरतात
- सूचना फलकांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष
- पर्यटकांच्या अरेरावी, दादागिरीमुळे वारंवार अपघात
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.