ओरोस (सिंधुदुर्ग) : देशात कोरोना सोबत धुमाकूळ घालणाऱ्या सारी या साथीचा जिल्ह्यात फैलाव झालेला नाही. मात्र, मालवण व देवगड तालुक्यातील किनारपट्टी भागातील मश्चिमारांत हात, पाय सुजन्याचा प्रकार सुरु आहे. ही कोणतीही साथ नसली तरी दरवर्षी हा आजार होतो. हात, पाय सुजन्याच्या आजारावर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा मालवण, देवगड या तालुक्यात सर्वे करीत आहे. परंतु या आजाराचे रुग्ण खाजगी दवाखान्यात जात असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेला या आजाराचे नेमके निदान करताना अडचण येत आहे. त्यामुळे अशा आजाराच्या रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे. यासाठी औषध उपलब्ध आहे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना केले.
यावेळी पुढे बोलताना मंत्री सामंत यांनी, १५ ते २४ एप्रिल या कालावधीत जिल्हा रुग्णालयात ७ रुग्णांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. पण घाबरण्याची गरज नाही. कारण या व्यक्तींचा झालेला मृत्यु हा कोरोना किंवा सारी आजाराने झालेला नाही. यातील चार व्यक्तींचा मृत्यु टीबी आजाराने झाला आहे. एक अल्कोहॉलिकमुळे झाला आहे. एक मधुमेह वाढल्याने झाला आहे. तर एका महिलेचा मृत्यु गंभीर आजाराने झाला आहे. या सातही रुग्णांचे कोरोना नमूने निगेटिव्ह आले आहेत. तसेच यातील दोन व्यक्ती सोडल्यातर सर्व वयस्कर होते, असे सांगितले. ताप असलेला कोणत्याही आजाराचा रुग्ण आयसोलेशनमध्ये दाखल करावा, असे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे हे सर्व रुग्ण आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले होते, असे यावेळी सामंत यांनी सांगितले.
माकडताप लॅब प्रस्ताव फेटाळला
जिल्ह्यातील दोडामार्ग भागात सध्या माकडताप आजार बळावला आहे. ३४ व्यक्तींना हा आजार झाला असून यातील ४ व्यक्ती मयत झाल्या आहेत. तर ३० व्यक्तींना घरी सोडले आहे. याचे निदान करण्यासाठी पुणे येथे नमूने पाठविण्यात येतात. मात्र, तेथे दिवसाला एकच नमूना तपासणी होते. मणिपाल येथे पाठविल्यास दिवसाला ६ चाचण्या होवू शकतात. माकडताप लॅब जिल्ह्यात होण्यासाठी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ५० लाख रूपये मंजूर केले होते. ही लॅब १ मे पर्यंत सुरु करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. परंतु लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया लांबली आहे. लॅबचा पाठविलेला प्रस्ताव आरोग्य संचालकांनी फेटाळला. हा प्रस्ताव पुन्हा फेटाळू नये, यासाठी परिपूर्ण प्रस्ताव पुन्हा पाठविण्यात येणार आहे. त्याबाबत आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्याशी आपले बोलणे झाले आहे.
हेही वाचा-केरळातील बनाना चिप्स रत्नागिरीत, तर हापूस राजकोटला....
चाकरमान्यांबाबत आदर पण...
सिंधुदुर्गातील चाकरमानी मोठ्या संख्येने पुणे, मुंबई येथे अडकले आहेत. त्यांना आपल्या गावी यायचे आहे. मलाही काहीजण तशी विनवणी करीत आहेत. त्यांची मागणी चुकीची नाही. मी त्यांना दोष देणार नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेश दिलेले आहेत. मला चाकरमानी यांच्याबाबत आदर आहे. त्यांना तेथे भीती वाटत आहे. पण निर्णयामुळे मी काही करू शकत नाही. भविष्यात केंद्र व राज्य शासनाने या चाकरमान्यांना गावी जाण्यास परवानगी दिली तर त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेवू, असे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा-हुश्श ! रत्नागिरी जिल्हा झाला कोरोनामुक्त : 3 मेपर्यंत संयम पाळा ; उदय सामंत
तर रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परजिल्ह्यातून दाखल होणाऱ्या व्यक्ती या रेल्वे ट्रॅकवरुन येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तेथील स्टेशन मास्टर त्यांना रोखताना दिसत नाहीत. याबाबत आपण रेल्वे अधिकाऱ्यांशी बोललो आहोत. यापुढे रेल्वे ट्रॅकचा वापर करून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करणार. तसेच या नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे अधिकारी यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी मंत्री सामंत यांनी दिला. तसेच अन्य मार्गाने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या तसेच खोटे पास घेवून येणाऱ्या नागरिकांना २८ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.