श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : राज्यातील साखर कामगारांचा पगारवाढीचा दोन-अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मध्यस्थीने अखेर मार्गी लागला आहे.
शरद पवार यांच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी
कामगारांना एप्रिल २०१९पासून १२ टक्के पगारवाढ देण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा त्रिपक्षीय समितीचे सदस्य राजेंद्र नागवडे यांनी दिली. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुलात (पुणे) झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागवडे म्हणाले, की राज्यातील साखर कामगारांचा पगारवाढीचा २०१४मध्ये झालेला करार ३१ मार्च २०१९ रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे एप्रिल २०१९ पासून नवीन करार करून साखर कामगारांच्या पगारवाढीची मागणी कामगारांनी केली होती. त्यानुसार यावर योग्य तोडगा काढून शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने मालक प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी, अशी राज्यस्तरीय पक्षसमिती स्थापन करून समितीस पगारवाढीसंदर्भात शिफारस करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार गेले सहा महिने समितीच्या बैठका होत होत्या. तथापि, त्यात कुठलाही निर्णय होत नव्हता. शेवटी निर्णयप्रक्रियेमध्ये शरद पवार यांनी मध्यस्थी करून साखर कामगारांना एप्रिल २०१९ पासून बारा टक्के पगारवाढ देणे व इतर मागण्या मान्य करून यशस्वी तोडगा काढला आहे. बैठकीला साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेंद्र नागवडे, कल्लाप्पा आवाडे, चंद्रदीप नरके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, कामगार संघटनेचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, आनंदराव वायकर उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.