पुणे : "यंदा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी, तर मराठवाड्यात दुष्काळामुळे ऊसाची टंचाई आहे. यामुळे अनेक कारखाने कमी क्षमतेने सुरू आहेत. याही परिस्थितीत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा प्रयत्न कारखाने करत आहेत. मात्र, एफआरपी देताना कारखान्यांना कोणतीही सवलत देण्याची राज्य सरकारची भूमिका नाही,'' असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
सहकार व पणन विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी साखर संकुल येथे गुरुवारी (ता.16) आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, "ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उसाला चांगला दर मिळण्याची मागणी असते. प्रत्येक साखर कारखाना उद्योग नफ्यात आणण्यासाठी आणि उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र, इतर उद्योगांप्रमाणे साखर उद्योगाचे नाही. या उद्योगाला एक चक्र असून, दरवर्षी विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असते. त्याला सामोरे जात उद्योग सक्षम करण्यासह दूरगामी उपाययोजनांसाठी प्रयत्न करण्यात येतील. साखरेच्या निर्यातीमुळे ऊस उत्पादकांना चांगला दर देणे शक्य होणार आहे. त्यामुळे कारखान्यांना साखरेच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल.'
यापूर्वी आपण साखर कारखाना संघामध्ये काम केले आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून असून, ते सामंज्यस्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.