मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. या सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले. मात्र, या बहुमत चाचणीपूर्वीच भाजपने सभात्याग केला. त्यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप विश्वासदर्शक ठरावापूर्वी सभागृहातून बाहेर पळण्याचे निमित्तच शोधत होता.
विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी आज झाली. यामध्ये 169 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. तर इतर 4 आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र, भाजपने सभात्याग केला. त्यावर मलिक म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मान्यतेमुळे दिलीप वळसे-पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्यपालांनी दिलेल्या मान्यतेनंतरच विधिमंडळाचे सत्र सुरु करण्यात आले.
याशिवाय मलिक पुढे म्हणाले, भाजपला सभागृहातून पळण्यासाठी फक्त निमित्तच हवे होते. त्यामुळेच ते सभागृहात गोंधळ घालत होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून काही शिकणे गरजेचे आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याचे काय काम असते ते.
आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही : सुप्रिया सुळे
भाजप विश्वासदर्शक ठरावापासून दूर पळून गेला आहे. आम्ही पूर्णपणे लोकशाही मार्गाने जात आहोत. आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही. आमच्यासाठी ही वैयक्तिक लढाई नाही. प्रेमाने त्यांचे मन जिंकू, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.