राज्यातील 70 पैकी 28 खासदारांनीच निवडली गावे मुंबई - "सांसद आदर्श ग्राम' योजनेतून ग्रामीण भागातील गावे खासदारांनी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. या योजनेनुसार गावे निवडण्याची दुसऱ्या टप्प्यातील मुदत जून 2016 रोजी संपली. राज्यातील 70 पैकी फक्त 28 खासदारांनी गावे दत्तक घेतली आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती मोहिमेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांसद आदर्श ग्राम योजनेच्या राज्य समन्वयक अधिकारी आर. विमला यांनी तब्बल पाच वेळा पत्रे पाठवूनही त्याकडे खासदारांनी दुर्लक्ष केले आहे. या योजनेसाठी वेगळा निधी नसल्याने खासदार गावे दत्तक घेण्यास उत्सुक नाहीत, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेबाबत विमला यांनी 5 ऑगस्ट ते 15 एप्रिल 2017 पर्यंत पाच वेळा खासदारांना स्मरणपत्रे पाठवली; पण त्याची पोचपावतीही मिळालेली नाही. 15 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा पत्र पाठवण्यात आले. या पत्रात केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर राज्यातील 70 पैकी केवळ 28 खासदारांनी ग्रामपंचायतीची निवड केल्याचे निदर्शनास आल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. खासदारांनीच गावाची निवड करून जिल्हा प्रशासनाला पत्र द्यायचे असते. या गावाची संकेतस्थळावर नोंद होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन त्या गावातील विकासकामांसाठी गटविकास अधिकारी नेमते. अधिकाऱ्याने तयार केलेल्या आराखड्यानुसार कामे केली जातात. खासदारांनी निवडलेली गावे लोकसभा - शिवाजी आढळराव पाटील (संदभोरवाडी, ता. खेड, पुणे), आनंद अडसूळ (कलामखर, ता. धरणी, अमरावती), अशोक चव्हाण (चंडोला, ता. मुखेड, नांदेड), दिलीप गांधी (कसारे, ता. पारनेर, अहमदनगर), रक्षा खडसे (खिर्डी, ता. रावेर, जळगाव), चंद्रकांत खैरे (पालखेड, ता. वैजापूर, औरंगाबाद), सदाशिव लोखंडे (रांजणगाव देशमुख, कोपरगाव, नगर), धनंजय महाडिक (कसबा तरले, राधानगरी, कोल्हापूर), पूनम महाजन (वाधडी, ता. डहाणू, पालघर), विजयसिंह मोहिते पाटील (शिंगणापूर, ता. माण, सातारा), अशोक नेते (ठाणेगाव, आरमोरी, गडचिरोली), कपिल पाटील (सापगाव, शहापूर, ठाणे), संजय काका पाटील (येलदरी, जत, सांगली), अरविंद सावंत (खुदळा, पालघर), राजू शेट्टी (बुबनाळ, शिरोळ, कोल्हापूर), गोपाळ शेट्टी (शिवनसाई, वसई, पालघर), अनिल शिरोळे (कासरी, शिरूर, पुणे), रामदास तडस (पर्डी, कारंजा, वर्धा), चिंतामण वनगा (गिरगाव, तलासरी, पालघर) राज्यसभा - डी. पी. त्रिपाठी (श्रीसुफळ), माजिद मेमन, (शिंद, भोर, पुणे), पीयूष गोयल (खिरन्सना, अमरावती), वंदना चव्हाण (खोर, दौंड), राजकुमार धूत (गाढे पिंपळगाव, औरंगाबाद), शरद पवार (जवळार्जुन). राहुल शेवाळे, विनायक राऊत यांनी गावाची निवड केली आहे. मात्र वेबपोर्टलवर नावे अपलोड केलेली नाहीत. गाव न निवडणारे खासदार लोकसभा : किरीट सोमय्या, अनंत गीते, श्रीरंग बारणे, गजानन कीर्तिकर, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, सुभाष भामरे, ए. टी. पाटील, हीना गावित, हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, संजय धोत्रे, प्रतापराव जाधव, भावना गवळी, नाना पटोले, हंसराज अहिर, कृपाल तुमाने, नितीन गडकरी, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे, सुनील गायकवाड, राजीव सातव, रवींद्र गायकवाड, संजय जाधव, शरद बनसोडे. |