औरंगाबाद : महापालिकेत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने औरंगाबाद शहराच्या नामांतराचा जुना विषय ऐरणीवर आणला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत नामांतराचा प्रस्ताव घेण्यात यावा, असे पत्र भाजपच्या नगरसेवकांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले आहे. मात्र महापौरांनी या प्रस्तावाला 'खो' दिला असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपला नामांतराची आठवण का झाली नाही? असा प्रश्न करत त्यांनी यापूर्वीच दोन ठराव मंजूर आहेत, त्यामुळे नव्या ठरावाची गरज नाही, असे शनिवारी (ता.21) स्पष्ट केले.
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर राज्यात दोन्ही पक्षांत कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले. भाजपने महापालिकेत शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी संभाजीनगर नामांतराचे अस्त्र काढले आहे. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, विजय औताडे, दिलीप थोरात यांनी महापौरांना पत्र देऊन आगामी सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव घेण्याची विनंती केली आहे.
हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना
या शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ठराव घेऊन तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा, असे पत्रात म्हटले आहे. त्यावर महापौर म्हणाले, की शहराचे संभाजीनगर व्हावे असे भाजपला वाटत होते तर त्यांनी मागील पाच वर्षांत ते का केले नाही, आता ते केवळ स्टंटबाजी करत आहेत. त्यांचे हे प्रेम बेगडी आहे, असे सांगितले.
काय आहे नामांतराचा वाद?
शहराच्या नामांतराचा वाद 1988 पासून सुरू आहे. शिवसेनेच्या तत्कालीन महापौर सुनंदा कोल्हे यांनी 19 जून 1995 मध्ये नामांतराचा ठराव मंजूर केला होता. प्रफुल्ल मालाणी, संजय जोशी, रजनी जोशी आणि प्रदीप जैस्वाल यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्याला विजय मेहर, वसंत देशमुख, सुदाम सोनवणे, महादेव सूर्यवंशी आणि प्रभाकर विधाते यांनी अनुमोदन दिले होते. या ठरावानंतर शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली. मात्र, पुढे प्रकरण न्यायालयात गेले.
हेही वाचा : video - इथे प्या एक रुपयात एक घोट चहा
त्यानंतर अनिता घोडेले यांनी चार जानेवारी 2011 ला सर्वसाधारण सभेत पुन्हा हा ठराव मंजूर करून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गिरिजाराम हळनोर, महेश माळवदकर, आगा खान यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. राजू वैद्य, अनिल मकरिये, संजय चौधरी, त्र्यंबक तुपे व जगदीश सिद्ध यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले होते. दरम्यान न्यायालयातून यासंदर्भातील याचिका मागे घेण्यात आली असली तरी शहराचे नामांतर मात्र होऊ शकले नाही.
मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.