बीड : भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ(chitra vagh) यांनी शुक्रवारी (ता. सात) शिवसेनेवर जोरदार फटकेबाजी केली. मात्र, त्या ज्या पीचवरून फटके लगावत होत्या ते शिवसेनेच्याच क्षीरसागर बंधूंनी उपलब्ध करून दिले होते. पूर्वी राष्ट्रवादीत असताना भाजपच्या मार्गाने शिवसेनेत गेलेले आणि आता शिवसेनेसोबतही काहीसा दुरावा असलेले क्षीरसागर नव्या राजकीय समीकरणांच्या मांडणीच्या तयारीत तर नाहीत ना? असा प्रश्न राजकीय जाणकारांसमोर आहे.
क्षीरसागरांच्या(kashirsagar) आधिपत्याखालील बीड नगर पालिकेने(beed nagarparishad) महिला बचत गटांचा मॉल सुरु केला आहे. या सौ. केशरकाकू महिला बचत गट मॉलचे उद्घाटन चित्रा वाघ यांच्याहस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर(jaidatt kshirsagar), नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर आदी उपस्थित होत्या. दरम्यान, क्षीरसागर बंधू सध्या शिवसेनेत कार्यरत असताना
उदघाटनासाठी भाजपच्या चित्रा वाघ आणि प्रमुख पाहुण्या म्हणून काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना निमंत्रीत केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया अगोदरच उंचावल्या होत्या. दरम्यान, सव्वालाखे उपस्थित राहिल्या नाहीत. महायुती सरकारच्या काळात जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीतून विजयी झालेले एकमेव आमदार होते. मात्र, पक्षात घुसमट होत असल्याने त्यांनी भाजपची अधिकचा संपर्क वाढविला. पालिकेच्या विकासकामांच्या उदघाटनाला त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी नेत्यांना बायपास करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडेंना बोलविले होते. तेव्हाच क्षीरसागर भाजपमध्ये जातील असे आडाखे बांधले जात होते.
मात्र, क्षीरसागर व मुंडे दोघेही ओबीसी असल्याने ‘एकाच म्यानात दोन तलवारी’ हा पेच निर्माण झाला आणि क्षीरसागर बंधूंनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. सहा महिन्यांसाठी शिवसेनेने महायुती सरकारमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेने कॅबीनेट मंत्रीपदही दिले. अलीकडे शिवसेनेत दोन्ही क्षीरसागर बंधू फारसे सक्रिय दिसत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्रिपद जरी त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे असले तरी सत्तेच्या दोन वर्षांत बीडमध्ये फार मोठा प्रकल्प किंवा शिवसेनेच्या झेंड्याखालील क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली मोठा कार्यक्रम देखील झालेला नाही. विशेष म्हणजे पालिकेच्या संदर्भात नगर विकास मंत्र्यांकडील तक्रारीत देखील पक्षाने फारशी मदत केली नसल्याने नाराजी आहेच. पक्षपातळीवर आणि सरकार पातळीवर देखील जयदत्त क्षीरसागर मेन स्ट्रीमध्ये फारसे दिसत नाहीत. नगर पंचायत निवडणुकांच्या निमित्ताने काही दिवस त्यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा असला तरी क्षीरसागरांच्या आधिपत्याखालील पालिका व इतर कार्यक्रमांत शिवसेना असा उल्लेखही अलीकडे आढळत नाही. बीड शहराची सामाजिक रचना पाहता नगर पालिका
निवडणुकीत शिवसेनेचे चिन्हच त्यांना अवघड वाटतेय असे बोलले जाते. त्यातच या कार्यक्रमाला चित्रा वाघ आणि संध्या सव्वालाखेंना निमंत्रणामुळे आता नवनवे अंदाज बांधले जात आहेत.मुंबई महानगर पालिकेचे बजेट ४० हजार कोटी रुपये आहे. मात्र, मुंबई महापालिकेला जमले नाही ते बीड पालिकेने करून दाखविले असे क्षीरसागरांचे कौतुक आणि शिवसेनेवर टोला चित्रा वाघ यांनी लगावला. या कार्यक्रमासाठी येण्याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनीही कौतुक केल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले. सरकार इतर उद्योगांतच व्यस्त असून त्यांचे महिला उद्योगाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला. याच कार्यक्रमासाठी आलेल्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांवर महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.