नांदेड - खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील एक हजार गावांत जिल्हा प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या गावात दुष्काळी उपाययोजना जाहीर करून आठ विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश जारी करून संबंधितांना याची माहिती दिली आहे. जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप; तसेच रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शासनाला 2014 व 15 मध्ये कोरडा, तर 2016 मध्ये ओला दुष्काळ जाहीर करून उपाययोजना लागू कराव्या लागल्या होत्या. यानंतर खरीप हंगाम 2017 मधील पावसाळ्याच्या पाच महिन्यांत वार्षिक सरासरीच्या 625.60मिलिमीटरप्रमाणे 66.35 टक्के पावसाची नोंद झाली होती. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, खरीप पिकांच्या पीक कापणी प्रयोगाच्या ता. 15 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली व नायगाव या दहा तालुक्यांतील एक हजार 168 गावांतील अंतिम आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांसह राज्याच्या महसूल, मदत व पुनर्वसन विभागाला कळविला होता. उर्वरित नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, धर्माबाद आणि उमरी या सहा तालुक्यांतील अंतिम आणेवारी ही पन्नास पैशांपेक्षा जास्त आली आहे. अशा असतील उपाययोजना जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, सरकारी कर्जांचे पुनर्गठण, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या उपाययोजना तत्काळ लागू केल्या आहेत. |