औरंगाबाद - कुटुंबप्रमुख म्हटलं, की आपल्यासमोर पुरुषाचा चेहरा येतो; मात्र कोणत्याही आधाराशिवाय कुटुंब सांभाळत तिन्ही मुलांचा साभाळ करीत दोन अधिकारी घडविणारी माता म्हणून सुनंदा रोहिदास खाडे यांची ओळख आहे.
श्रीमती खाडे सध्या औरंगाबादेतील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प येथे अध्यापन करतात. पतीचा कुठलाही आधार नसताना तिन्ही मुलांना शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. या प्रवासाबद्दल सांगताना श्रीमती सुनंदा खाडे म्हणाल्या, की पती घर सोडून गेल्यानंतर लेकरांची शिकण्याची हिंमत होती; पण संसार एकदमच उघड्यावर पडला होता. मुलांकडे बघून जगण्याचं बळ मिळत गेलं. मुलांनाही जाणीव होत गेली. मोठ्या मुलाला शहरातील हॉस्टेलला शिकायला ठेवलं. शिवणकाम येत असल्याने ते काम मी करू लागले. दरम्यान, वर्ष २००४ मध्ये राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात कामास सुरवात केली.
शिवणकाम आणि प्रकल्पाची शाळा सांभाळून त्यांनी संसाराचा गाडा ओढला. मुलांनीही आईच्या कष्टाचे चीज केले. मोठा मुलगा विक्रांत याने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला. त्यानंतर कास्मो फिल्म्स् येथे नोकरीला लागला. त्यानंतर परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीस अभियंता म्हणून नोकरी केली. आता सध्या तो फुलंब्रीला (जि. औरंगाबाद) महावितरणचा अभियंता म्हणून काम पाहत आहे. विक्रांतने आईच्या संघर्षात साथ देत विशाल आणि अभिजित या दोन्ही भावांचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, यासाठी आई सुनंदाची प्रेरणा मिळाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अभिजित आता आरटीओ कार्यालयात वर्ग एकचा अधिकारी झाला आहे. विशालने एमसीए पूर्ण केलेले असून तो फायनान्स कंपनीत काम करीत आहेत.
‘‘परिस्थिती कोणतीही असो, खचून जायचं नाही, मीही तेच केलं. मुलांकडे बघून जगायला बळ मिळाले, मुलंही शिकत राहिली. आज घडीला स्वतःचे घर घेऊन मुलं, सुना, नातवंडे राहताना भूतकाळ आठवत नाही.’’
- सुनंदा खाडे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.