मुंबई : लेदरचे बूट, बेल्ट, पर्स, जॅकेट आणि बॅग अशा विविध वस्तू खरेदी करण्यासाठी धारावीत गर्दी होत असे. आता लॉकडाऊननंतर निर्बंध शिथिल होत असले तरी धारावीतील प्रत्येक व्यवसायावर कोरोनाचे सावट कायम आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणारे उद्योग परिस्थिती पूर्वपदावर येण्याची वाट पाहत आहेत. दुकाने खुली असली तरी ग्राहक नाहीत. मागणी नसल्याने कारखानेही बंद आहेत. कोरोनामुळे धारावीतील उद्योग दहा वर्षे मागे केल्याचे येथील व्यवसायिक सांगत आहेत. पर्यायाने कामगार आणि मालक परिस्थिती सुधारण्याची प्रतिक्षा करत आहेत.
एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत दुकाने पुन्हा उघडली आहेत. धारावीतील सर्वाधिक प्रसिद्ध चमडा बाजारही सुरू झाला आहे. पण, दिवसभर दुकाने खुले ठेवल्यानंतर एकही वस्तू विक्री होत नसल्याने मालक हवालदिल झाले आहेत. यापूर्वी तयार असलेला माल दुकानात पडून असल्याने कारखानदारांनी नवीन उत्पादन बंद ठेवले आहे. विदेशात मालाची निर्यात सुरू होत नाही, तोपर्यंत हा व्यवसाय पूर्वपदावर येणे कठीण असल्याचे कारखानदार सांगतात.
महत्त्वाची बातमी - मुंबईची पाणीकपात 10 टक्क्यांवर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा दिलासा
कोरोनापूर्वी धारावीत विदेशी पर्यटकांची वर्दळ होती. पर्यटक लेदरच्या वस्तू खरेदी करत. मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरातील उच्चवर्गीय लोक धारावीतील सायन-वांद्रे रस्त्यावरील लेदरच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत. त्याचप्रमाणे थेट कारखान्यांमध्येही जाऊन लोक खरेदी करत. मात्र, कोरोनानंतर कारखाने आणि दुकानदारांची अवस्था बिकट झाली आहे. धारावीतून जगभरात लेदरच्या वस्तू निर्यात होतात. पण, विमानसेवा बंद असल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व व्यवहार बंद असल्याने कामगारही गावी निघून गेल्याने कारखाने ओस पडले आहेत.
दहा वर्षे मागे गेलो :
धारावी ब्रॅंडचे निर्माते - वहाज खान म्हणतात, नोटबंदी, जीएसटी या धक्क्यातून बाजार हळूहळू सावरत होता. माझ्या दुकानात रोज 200 ते 300 परदेशी पर्यटक येत होते. परदेशात मालही निर्यात होत होता. कोरोनाने सर्व व्यवहार थांबल्याने माझा व्यवसाय दहा वर्षे मागे गेला आहे. माझ्याकडे 30 ते 40 कामगार काम करायचे. सुरूवातीला मी कामगारांची 2 महिने जेवण खाण्याची व्यवस्था केली. पण, अखेर कामगारांना खर्च देऊन गावी पाठवले. कोरोनापूर्वी माझ्या दुकानात उभा रहाण्यास जागा नसे. आता केवळ आम्ही दोन, तीन लोक दिवसभर असतो.
तर शेफर्ड लेदर दुकानमालक जेंद्र भोईटे म्हणतात, मी 8 जूनरोजी दुकान खुले केले. कोरोनापूर्वी दरदिवशी 10 ते 15 हजार रुपयांचा व्यवसाय होत असे. आता सर्व ठप्प आहे. महिन्याला काहीच पैसे हातात उरत नाही. कोरोना काळात धारावीला अधिक बदनाम केल्याने ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. या काळात 50 ते 60 लाखाचे उत्पन्न बुडाले आहे. ग्राहक येत नसल्याने ऑनलाइन विक्रीस सुरुवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाची बातमी - सिरो सर्व्हेला नागरिकांचा का मिळतोय अल्प प्रतिसाद? चाचणी पॉझिटिव्ह येण्याची लोकांमध्ये भीती
धारावीतील व्यापारी राजेश खंदारे म्हणतात, निर्यात बंद असल्याने धारावीतील उद्योग संकटात आहे. ईदनंतर चामडे लिलाव होतात. दरवर्षी, एका चामड्यासाठी 220 रुपये मोजावे लागत होते. यंदा एका चामड्यासाठी 15 रुपये भाव होता. यातूनच हा व्यवसाय किती संकटात आहे, हे दिसते. धारावीत चामड्याच्या वस्तू तयार करण्याचे सुमारे 300 कारखाने आहेत. यामध्ये 20 हजार कामगार काम करतात. या सर्वांचा रोजगार आता बंद आहे. दुकानांमध्ये कधी नव्हे, ते गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. गणपती उत्सव दुकानदारांना थोडासा दिलासा देईल. पण, गणेशोसवानंतर काय हा मोठा प्रश्न आहे.
( संपादन - सुमित बागुल )
corona broke backbone of economy of dharavi read inside story about dharavi leather market
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.