सरळगाव : गेली ३० वर्षे मुरबाडकरांना हुलकावणी देणारा कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प (Kalyan-murbad railway project) अखेर दृष्टिपथात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी या रेल्वे प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याची (Fifty percent fund) तयारी दर्शवल्यामुळे मुरबाडकरांच्या स्वप्नातल्या रेल्वे प्रकल्पाचे काम कागदावरून प्रत्यक्षात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा रेल्वे मार्ग झाल्यास मुरबाड तालुकाही मुंबईशी जोडला जाणार असून, येथील कष्टकरी शेतकरी (farmers) आणि नोकरदारांना रोज दळणवळणासाठी करावी लागणारी कसरत थांबण्यास मदत होणार आहे.
कल्याण-मुरबाड रेल्वे सुरू व्हावी यासाठी गेल्या ७० वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री शांताराम घोलप यांनी त्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न केले; मात्र गेल्या ३० वर्षांपासून हा प्रकल्प निवडणुकांपुरताच मर्यादित राहिला. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन भूमिपूजन करूनही हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. २०२४ च्या निवडणुकीला सामोरी जायचे असल्यास कल्याण-मुरबाड रेल्वे प्रश्न मार्गी लागला पाहिजे या साठी केंद्रीय पंचायत राज राज्यरामंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न मांडला होता.
त्यावर तत्कालीन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती; मात्र या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकार व ५० टक्के निधीचे सहाय्य राज्य सरकारकडून आवश्यक होते. आता या प्रकल्पपूर्तीसाठी आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी ५० टक्के निधी देण्याचे विचाराधीन असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे मुरबाडकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
सर्वच बाजूंनी गैरसोय
१) मुरबाड हा एकमेव तालुका असा आहे, की ज्याच्या कल्याण, शहापूर, कर्जत आणि अंबरनाथ या चारही बाजूंचे तालुके रेल्वेने जोडले गेले आहेत; मात्र मुरबाड स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रेल्वे वेपासून वंचित राहिला आहे. परिणामी, येथील रहिवाशांना आजही दळणवळणासाठी एसटीवरच अवलंबून राहावे लागते; मात्र अपुऱ्या सेवेमुळे शेकडो प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून काळ्या-पिवळ्या जीपमधून प्रवास करावा लागतो.
२) प्रवासी व मालवाहतूक करण्याची साधने कमी पडत असल्याने तालुक्यातील शेतकरी व आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला आणि तालुक्यात पिकणारा रानमेवा कमी भावाने विकावा लागतो. दुसरीकडे तालुक्यातील चाकरमान्यांना रोजचा हा प्रवास झेपत नसल्याने अनेकांनी आपले बस्तान जवळच्या शहरी भागात हलवले आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे हा येथील कळीचा मुद्दा ठरला आहे.
राज्य सरकारचे ५० टक्के निधी देण्याकरिता मान्यता देणारे पत्र प्राप्त झाल्यास ते केंद्राकडे मान्यतेसाठी जाईल. त्यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांची परवानगी मिळताच निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ही प्रक्रिया पूर्ण होऊन हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल असा विश्वास आहे.
- कपिल पाटील, केंद्रीय मंत्री
मुरबाडकरांसाठी रेल्वे फार महत्त्वाची आहे. तालुक्यापासून मुंबई १०० किलोमीटरवर आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. तसेच आदिवासी बांधवांना जंगलातून मोठ्या प्रमाणात रानमेवा मिळतो; मात्र मुंबई, ठाणे या शहरांकडे हा माल थेट छोट्या शेतकऱ्यांना नेता येत नसल्याने मिळेल त्या भावात हा माल विकावा लागतो. हा रेल्वे मार्ग झाल्यास येथील भाजीपाला व रानमेव्याला बाजारपेठ मिळेल व येथील कष्टकरी समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
- किसन कथोरे, आमदार, मुरबाड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.