rbi governer
rbi governer sakal
मुंबई

सरकारची गरज ओळखून RBI ने जुळवून घेणारे धोरण स्वीकारलेय : गव्हर्नर दास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चलनवाढीचा वेग लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच्या या तिमाही पतधोरणात रेपो आणि रिव्हर्स रेपो हे व्याजदर जैसे थे ठेवले. सलग दहाव्यांदा रिझर्व्ह बँकेने आहे तीच स्थिती कायम ठेवली आहे.

त्यानुसार आता रेपो रेट चार टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के इतका कायम राहील, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिली. बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने दोन दिवसांच्या बैठकीत अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्यावर आज एकमताने हा निर्णय दिला. सरकारी बँकांना पैसे देताना रिझर्व्ह बँक जे व्याज आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर बँकांनी आपल्याकडील जादा पैसे रिझर्व्ह बँकेकडे ठेवल्यावर जे व्याज मिळते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

चलनवाढीचा दर रोखण्याची निकड तसेच सरकारची निधी उभारण्याची गरज हे ध्यानी घेऊन रिझर्व्ह बँकेने जुळवून घेणारे धोरण स्वीकारले आहे. जोपर्यंत गरज भासेल तोपर्यंत हे असेच अनुकूल धोरण स्वीकारले जाईल, असे स्पष्टीकरण दास यांनी यावेळी दिले.

यावर्षात देशाचा जीडीपी 9.2 टक्क्यांनी वाढेल, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे, तर त्यापुढील वर्षात हा दर 7.8 टक्के इतका राहण्याची अपेक्षा आहे. यावर्षी मार्च अखेरपर्यंत ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढ 5.3 टक्के तर जून नंतर 4 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. तेव्हा वेगळी पावले उचलता येतील, असेही आज सूचित करण्यात आले.

नोव्हेंबर महिन्यात देशातील किरकोळ चलनवाढीचा दर 4.91 टक्के होता. पुढील महिन्यात तो 5.59 टक्क्यांवर गेला हे चिंतेचे वातावरण असल्याचेही दाखविण्यात आले.

ओमायक्रॉनच्या फैलावामुळे देशाचे अर्थचक्र काहिसे मंदावले आहे, तसेच ओमायक्रॉनमुळे जागतिक स्तरावर होऊ शकणारी उलथापालथ पाहता अशाच प्रकारे सरकारला धोरणात्मक पाठिंबा देणे जरुरी आहे. चालू खात्यावरील तूट यावर्षीच्या जीडीपी च्या दोन टक्क्यांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. सध्याची स्थिती पाहता आम्ही काळजीपूर्वक पावले उचलीत आहोत, असेही दास यांनी सांगितले.

आयएमसी कडून स्वागत

ओमायक्रॉनचा जागतिक स्तरावर होणारा परिणाम पाहता रिझर्व्ह बँकेचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया इंडियन मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष जुझार खोराकीवाला यांनी व्यक्त केली. त्यामुळे विकासाला हातभार लागेल, तसेच ग्राहकांची मागणी अजूनही कमीच असताना या धोरणामुळे अर्थचक्र सुरळित होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

क्रिप्टोकरन्सीचा अर्थव्यवस्थेला धोका

आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याला मोठा धोका आहे, असेही दास यांनी धोरण जाहीर करताना सांगितले. अर्थव्यवस्था सुरळित होत असतानाची स्थिती पाहता पत-कर्जमागणी पूर्ण करण्यास भारतीय अर्थव्यवस्था सक्षम आहे. तसेच परदेशी चलनसाठ्याची स्थितीही समाधानकारक असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT