मुंबई : कोरोनामुळे मुंबईतील सव्वाशे कोटींची उलाढाल असलेला फटाका व्यवसाय अडचणीत सापडला आहे. प्रदूषणासंदर्भात झालेल्या जनजागृतीमुळे फटाके खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ दोन टक्के फटाके विक्री झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादित माल पडून असल्याने विक्रेत्यांना मोठा झटका बसला आहे.
या वर्षी कोरोना संकटामुळे व्यापक जनजागृती झाल्याने अनेकांनी फटाक्यांपासून दूर राहण्याचे ठरवल्याचे चित्र आहे. एकट्या मुंबईत साधारणपणे सव्वाशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत असल्याचे फटाका व्यापारी सांगतात. मुंबईतील मोहंमद अली मार्गावरील मोठे व्यापारी इसाभाई, कुर्ला येथील राजेश नाथानी, अश्फाक भाई, नवी मुंबईतील प्रशांत करांडे हे फटाक्याचे घाऊक विक्रेते आहेत. त्यांच्या दुकानावर या वर्षी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दिवाळी हंगाम संपण्यास अजून एक आठवडा बाकी असल्याने व्यवसाय होईल, अशी आशा या व्यावसायिकांना आहे. दरवर्षी नागरिक दिवाळीत एकाच वेळी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची फटाके खरेदी करीत होते. यंदा मात्र अनेकांची आर्थिक स्थिती खालावल्याने केवळ फुलबाजे व भिंगरी 200 ते 300 रुपये खर्च करीत असताना दिसत आहेत. फटाके कंपनीला विक्रेत्यांना आधी मालाची नोंदणी करावी लागते. त्यामुळे मागणीप्रमाणे फटाके घ्यावे लागतात. राज्य सरकारने इतर राज्यांप्रमाणे फटाक्यांवर बंदी घालणार असेल तर एक वर्षांपूर्वी निर्णय घेणे गरजेचे आहे. विक्रेत्यांनी फटाके कंपनीला एक वर्षं आगाऊ रक्कम दिल्यावर राज्य सरकार निर्णय घेऊन व्यापारी वर्गाचे नुकसान करीत आहे, असे मत फटाके उत्पादक व विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे.
नागरिकांची खरेदीकडे पाठ
गेल्या काही वर्षांमध्ये फटाक्यांमुळे वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण होत असल्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्यामुळे सुतळी बॉम्ब, ताजमहाल, लवंगी, साप गोळी, लक्ष्मी बार या जास्त धूर व आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीत घट झाली असून, केवळ लहान मुलांची सुरसुरी व भूचक्रची मागणी आहे. गेल्या काही वर्षांत फटाके फोडण्याचा कल कमी व्हायला लागल्याचे फटाके व्यवसायिकांनी सांगितले आहे.
फटाके, ध्वनिप्रदूषणामुळे प्रदूषणात वाढ होऊन फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढतील. खोकला होऊन दम्याचा झटका येऊ शकतो. फुफ्फुस खूप अशक्त होतात. कोरोना व प्रदूषण याची जोड असल्याने कोरोना रुग्णाची बऱ्याच प्रमाणात वाढ होऊ शकते. या कोरोना काळात फटाके फोडू नये. पर्यावरणाची काळजी सर्वानी घेतली पाहिजे.
- डॉ. अरविद काते, फुफ्फुस तज्ज्ञ, झेन रुग्णालय, चेंबूर.
एक वर्षापासून फटाके बनवायचे काम करतो. 1500 कामगार काम करतात. फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते मग अनेक रासायनिक कंपनी आहेत. त्याच्यामुळे प्रदूषण वाढत नाही का? कोरोना काळात सर्व कंपनी बंद होत्या. मग प्रदूषण कसे झाले? कोणताही परवाना घेतल्याशिवाय माल तयार करू शकत नाही. आमच्याकडे सर्व फटाके हाताने बनवले जातात. मात्र आता ग्राहकच नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
- गोविंद शिरोळे, फटाके विक्रेता.
------------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.