विरार : गणपती विसर्जनावेळी (Ganpati Festival) काहीजण पाण्यात वाहून गेल्याच्या घटना आपण पाहत असतो. परंतु, गणपती बरोबर त्याच्यासाठी बनविलेला सोन्याचा मुकुट (Gold crown) पाण्यात वाहून गेल्याची घटना विरळच. परंतु, वसईत (vasai) बाप्पाचे विसर्जन करताना चक्क तीन लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुटसुद्धा विसर्जन (Crown visarjan) केल्याची घटना घडली मात्र पट्टीच्या पोहणाऱ्याने (Professional swimmer) तब्बल पाऊण तासानंतर मुकुट तलावातून (crown found) शोधून काढत वाहवा मिळविली.
वसईत उमेळमान गावातील शिवसेनेचे पालघर जिल्हा सचिव विवेक पाटील यांच्याकडे गेली चाळीस वर्षे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना भाद्रपद महिन्यात होत असते. पाटील यांचे भाऊ हरीश पाटील यांनी 1997 साली घरच्या बापाला साडे पाच तोळ्याचा जवळपास तीन लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट बनविला होता.दरवर्षी भाद्रपदात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर हा मुकुट बापाच्या डोक्यावर घालण्याचा येत असे. तसेच विसर्जनाच्यावेळी तो पुन्हा काढून ठेवला जाई. मात्र यावर्षी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पाटील कुटुंबातील संजय पाटील (वय वर्ष 50) यांना शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर त्यांना वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.तेथे त्यांचे निधन झाले. त्यामुळे पाटील कुटुंबांना सुतक लागू झाले. सुतकात गणेश मूर्ती घरी कशी ठेवायची म्हणून गावकऱ्यांनी निर्णय घेत शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान विवेक पाटील यांच्या घरातील गणेशाची मूर्ती घराजवळील तलावात विसर्जन केली.मात्र या घाईगडबडीत गणेशाच्या मूर्तीला घातलेला सोन्याचा मुकुट मात्र काढण्यास सगळे विसरले. रात्री उशिरा घरची पुरुष मंडळी आल्यानंतर गणेशाचा मूकूट देखील मूर्तीसोबत तलावात विसर्जन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
रविवारी या तलावात मुकुटाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.यादरम्यान विवेक पाटील यांनी पाणजू येथील मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले. विरार येथील पट्टीचे पोहणारे सदानंद भोईर हे त्यांच्याच गावातील एका नातलगाकडे आल्याची माहिती त्यांना मिळाली. लागलीच त्यांनी सदानंद यांच्याशी संपर्क साधत तलावातील मुकुट शोधून देण्याची विनंती केली. भोईर यांनीही तलावातील पाण्यात जवळपास पाऊण तासाच्या शोध घेतल्यानंतर पाटील कुटुंबीयांच्या गणपतीचा मुकुट शोधून काढला.तलावातील 16 फूट पाणी,दीड फूट गाळ व दिड दिवसांचे तब्बल 96 गणेशमूर्तींचे विसर्जन झालेले असतानाही,त्यांनी अचूकपणे पाटील कुटुंबांचा गणपती व त्यावरील असलेला मुकुट पाण्यातून शोधून वर आणला.
गणेशाच्या सोबत विसर्जन झालेला सोन्याचा मुकुट जवळपास सोळा तासानंतर पुन्हा पाटील कुटुंबियांच्या हाती मिळाल्यामुळे बाप्पा गणेशानाच रिटर्न गिफ्ट दिल्याची भावना पाटील कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.तलावातील गाळात रुतलेली एखादी वस्तू पुन्हा मिळण्याची शाश्वती नसतानाही ती पुन्हा गणेशाच्या कृपाशीर्वादाने मिळाले असल्याची भावना विवेक पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.