नांदेड - पहिल्या लॉकडाउनमध्ये नांदेडला एकही रुग्ण सापडला नाही पण नंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली असून आता शंभरीच्या जवळ पोहचली आहे. नांदेडला आत्तापर्यंत ९७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ३० रुग्ण बरे झाले आहेत. ही समाधानाची बाब असली तरी कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या नांदेडकरांसाठी चिंतेची बाब ठरली असून नांदेडवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत.
कोरोनाग्रस्तांचा आकडा अजूनही जगभरातील विविध देशात वाढतो आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे. नांदेडला देखील सुरवातीला काहीच नसताना आता मात्र रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ही चिंतेची आणि काळजी करणारी बाब आहे. आता यातून प्रशासनासह नागरिकांना देखील विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
शहरासह ग्रामिण भागात रुग्ण
सुरवातीला नांदेड शहरात रुग्ण आढळून आले. पण आता ग्रामिण भागातही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये माहूर आणि बारडचा समावेश आहे. त्याचबरोबर शहरात सुरवातीला वजिराबाद गुरुद्वारा तसेच देगलूरनाका रहेमतनगर येथे रुग्ण आढळून आले. आता जुन्या नांदेडात करबला, सराफा, कुंभार गल्ली भागात रुग्ण आढळून आले आहेत. ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे त्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत.
नांदेडवर चिंतेचे ढग
कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून आता नागरिकांच्या मनातही चिंतेचे ढग जमा झाले आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या ठिकाणी व आजूबाजूचा परिसर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने निर्जतुकीकरण करुन घेण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंनटाइन करण्यात येत आहे.
हेही वाचलेच पाहिजे - व्यापाऱ्यांना दिलासा - नांदेडला अशी सुरु राहणार दुकाने...
दोन दिवसात वाढली संख्या
नांदेडला शनिवारी (ता. १६) सकाळी आलेल्या अहवालात १८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तसेच रविवारी (ता. १७) सकाळी आलेल्या अहवालात १३ नमुने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे दोन दिवसात तब्बल ३१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे नांदेडकरांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
दक्ष राहण्याची गरज
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आता आणखी दक्ष राहण्याची गरज आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत आता ता. ३१ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू अप’ डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या अपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.