देगलूर : पीकविमा कंपनीचे शेतकऱ्यांना लुटण्याचे धोरण सुरूच असून २५ टक्के अग्रीम रक्कम खात्यात अद्याप जमा करण्यात आलेले नाही. दुष्काळी निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे येवूनही शेतकऱ्यांच्या खात्यात आजतागायत दुष्काळ निधी जमा करण्यात आलेले नाहीत.
तसेच पीएम किसान सन्मान निधीतील त्रुटींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले असतानाही प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधीला याचे काहीही सोयरे सुतक राहिलेले नाही. दिवाळी सारखा सण शेतकऱ्यांना अंधारात साजरा करावा लागला. त्यामुळे शुक्रवारी (ता.२८) रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होत येथील तालुका कृषी कार्यालयाला बोंबाबोंब करून कुलूप ठोकले.
यावेळी शेतकऱ्यांनी कैलास येसगे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन दिले. काँग्रेस भारत जोडो यात्रेमध्ये असून, शिवसेना बेरोजगारांचा मेळावा भरवित आहे, तर राष्ट्रवादी आगामी निवडणुकीत मशगुल आहे. सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना तर या सर्व घटनांचा काहीही सोयरेसुतक राहिलेले नाही, एकीकडे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी बांधावर असून घरी दिवाळी सारखा सण हे त्याला साजरा करता आला नाही मात्र कोणत्याच पक्षाकडून यावर आवाज उठविला जात नसल्याने प्रशासनही ठप्प झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तहसील व कृषी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी भेटले नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात बोंब ठोकून कार्यालयाला कुलूप ठोकले. शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन करू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.