सांगली : अधिकारी, आमदार यांच्या फोन टॅपिंगमध्ये सहभागी असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाटील यांनी, उद्योजक अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांची हत्या या विषयांना विरोधक बगल देत असून, ते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही केला.
फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांमधील ६.३ जीबी डेटा इतक्या संभाषणाचे पुरावे म्हणून सादर केले होते. त्याबद्दल जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्याबाबत केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. कारण ते ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या म्हणतात त्यातल्या काहींच्या बदल्याच झालेल्या नाहीत. राहता राहिला मुद्दा बदल्यांमधील पारदर्शकतेचा. बदल्यांसाठी स्वतंत्र आस्थापना व्यवस्था आहे. त्यात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या आस्थापनेला डावलून बदल्या झाल्या का मुद्दा होऊ शकतो. तसे झालेले नाही. उलट आधीच्या गृहमंत्र्यांनी या आस्थापन व्यवस्थेला डावलून स्वअधिकारात तातडीची बाब म्हणून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात कोणती पारदर्शकता होती हे आधी त्यांनी स्पष्ट करावे.’’
हेही वाचा - सांगलीत जिल्ह्यात लवकरच सुरु होणार सेंद्रीय मॉल
ते म्हणाले, ‘‘फडणवीस यांनी अधिकाऱ्यांमधील संभाषणाचे ध्वनिमुद्रण मिळवले आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. हे त्यांनी मिळवलंच कसं? गुप्तवार्ता विभागाच्या रश्मी शुक्ला यांची यातली भूमिका टॅपिंग कोणाच्या परवानगीने झाले, तशी परवानगी घेतली होती का, ती कोणी घेतली अशा प्रश्नांची उत्तरे पुढे आली पाहिजेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. फडणवीस यांनी असं करूनच गेल्या सरकारमध्ये आमदार आणि अधिकाऱ्यांना धाक दाखवल्याचे दिसून येते. पोलिसांचे अनेक विभाग भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच वागत होते हे आता उघड होत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे सारे उघड होईल. अनेक आमदार-अधिकाऱ्यांचे असे टॅपिंग केले असण्याची शक्यता आहे.
‘एनआयए’ दोन दिवसांत गप्प का?
परमबीर सिंह यांच्या गृहमंत्र्यांवरील १०० कोटींच्या खंडणीच्या आरोपानंतर केंद्रीय तपास संस्था (एनआयए) अचानकपणे गप्प झाली आहे. अंबानींच्या घरासमोरील स्फोटके आणि मनसुख हत्या या दोन विषयांवर ‘एनआयए’चे अधिकारी आता माध्यमांशी बोलतानाच दिसत नाहीत. फडणवीसही या विषयांना बगल देऊन तिसरेच बोलत आहेत. महाराष्ट्राच्या ‘एटीएस’ने मात्र मनसुख हत्येच्या तपासात मोठी प्रगती करीत दोघांना अटकही केली होती. मात्र, त्याआधीच हा तपासही ‘एनआयए’ने आमच्याकडून काढून घेतला. आता या संपूर्ण प्रकरणात तपास करून दोषींना शोधण्याची जबाबदारी त्यांची आहे. यात कोण कितीही मोठा अधिकारी असला तरी तो जनतेसमोर आला पाहिजे. केंद्र सरकारने हा तपास गुंडाळता कामा नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.