कोल्हापूर : "एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही. शासनाच्या कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या मिळत नाही. यासुविधा देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खात्याचे मंत्री आणि सचिवांची बैठक पुढील आठ दिवसात घ्यावी. बैठकीचे समन्वयक म्हणून मंत्री सतेज पाटील यांनी काम पहावे. या बैठकीला सर्वांची संमती असेल तर मला बोलवा आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा निकाल एकाच बैठकीत संपवा,'' अशा आदेश वजा सुचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज येथे दिल्या.
येथील तपोवन मैदनात झालेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 56 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, संघटनेचे सरसचिटणिस हनुमंत ताटे, संघटना राज्याध्यक्ष संदिप शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, राजू लाटकर, नगरसेवक शारंगधर देशमुख आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले, "1984 साली एसटीचे कोल्हापुरात अधिवेशन झाले होते. तेव्हा भाऊ फाटक, जॉर्ज फर्नांडिस यांच्या समावेत मीही अधिवेशनास उपस्थित होतो. जशी एसटीची गाडी कधी थांबत नाही तसे माझेही अधिवेशनाला येणे थांबलेले नाही. अधिवेशनात संघटनांचे प्रश्न समजून येतात, त्यावरचे मार्ग सापडतात. 1976 साली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. दिल्लीतील सरकार कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा देईल, तशाच सुविधा त्या दिवसापासून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य व्हावी, असे मला वाटत होते. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हा निर्णय घेतला.'' तेव्हापासून कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत असे आंदोलन केले नसल्याचे खा.पवार यांनी सांगितले.
एसटीच्या संचित तोटा वाढत असल्याचे सांगत खा. पवार म्हणाले, "शासनाने या प्रकरणी जे लागेल ते करणे आवश्यक आहे.'' राज्य सरकारची शक्ती पाठिशी असल्याशिवाय एसटीच्या समस्या सुटणार नाहीत, असेही खा.पवार यांनी सांगितले.
पवारांचा लय जोर
एसटी कर्मचारी काहीही करु शकतात, याचा मी अनुभव घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते भाउ फाटक यांचे आणि माझे चांगले संबंध. त्यामुळे एसटी संघटनांचे अधिवेशन असो की साखर कारखाना संघटना, शिक्षक संघटना यांच्या अधिवेशनाला मी न चुकता जातो. 1967 साली पहिली निवडणूक लढत असताना एसटी कर्मचारी काय करु शकतात, याचा मी अनुभव घेतला. गावागावात फिरणाऱ्या एसटीतील कंडक्टर सांगायचे, शेजारील गावात गेलो होतो. जिकडे बघेल तिकडे पवारांचाच जोर आहे. बाजार गाडीतही हीच चर्चा. त्यामुळे जोर असो की नसो, एस.टी.कर्मचारी मात्र काहीही करु शकतात, हे त्यावेळी दिसून आले, असे सांगताच अधिवेशनात चांगलाच हशा पिकला.
खांदेपालटाचा परिणाम
दरवर्षीचे अधिवेशन व यावर्षीचे अधिवेशन वेगळे वाटत आहे. मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी असून उत्साह मोठा आहे. या अगोदरचे परिवहन मंत्री दिवाकर रावते चार वर्षे अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे अधिवेशनावर काही परिणाम झाला नाही. मात्र सत्ता बदलताच रावते यांची जबाबदारी काढून उध्दव ठाकरे यांनीही जबाबदारी अनिल परबांवर दिली. या बदलाचा परिणाम यंदाच्या अधिवेशनात दिसत असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.