शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने शाळा उघडण्यापूर्वीच कराव्या लागल्या बंद
पिंपरी - कोरोनामुळे बंद असलेली शाळा तब्बल नऊ महिन्यांनी पुन्हा गजबजणार होती. म्हणूनच विद्यार्थ्यांविना शांत शांत असलेल्या शाळांमध्ये लगबग सुरू झाली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शाळा, वर्गांचा कोपरा न कोपरा निर्जंतुक करण्यात आला होता. लगोलगच शिक्षकांचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वागताची आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची लगबग उडाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढल्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आदेशामुळे शाळा उघडण्यापूर्वीच पुन्हा बंद कराव्या लागल्या.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अनलॉक-6 अंतर्गत सूट मिळाल्यानंतर कोरोना नियमावली आणि सतर्कतेचा दावा करीत नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे नऊ महिन्यांनी शाळा गजबजणार होती. विद्यार्थी दिसणार असल्याने शिक्षक आनंदित होते. वर्गमित्र-मैत्रिणींची भेट होणार असल्याने विद्यार्थी वर्ग खूष झाला होता. शाळेच्या प्रांगणात-मैदानावर मुलांचा किलबिलाट कानी पडणार होता. तसेच पालकांनाही ऑनलाइन शिक्षणाच्या जाळ्यातून थोडी उसंत मिळणार होती. त्यामुळे एकूणच सगळीकडे आनंदी वातावरण होते.
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून दहा नोव्हेंबरला नियमावली जाहीर केल्यावर महापालिका, खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये स्वच्छतेपासून वर्ग भरविण्यापर्यंतची तयारी करण्यात येत होती. अनेक शाळांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी चौकोनही आखले होते. बहुतांश शाळांनी सॅनिटायझरचे स्टॅन्ड, थर्मल गन ठेवली होती. दररोज तीन ते चार तास शाळा भरण्याबरोबरच एका दिवशी फक्त पन्नास टक्केच विद्यार्थी उपस्थित राहणार असले तरी प्रत्येक वर्गांचा कोपरा नी कोपरा स्वच्छ केला होता. पालकांनी स्कूल बॅग, गणवेशापासून सगळीच जमवाजमव केली होती.
'आम्ही सगळी तयारी केली होती. परंतु अनेक शिक्षकांची कोविड टेस्ट झाली नाही, तर काहींचे रिपोर्ट वेळेत मिळाले नाहीत. पाल्यासाठी संमतिपत्र देण्यासही पालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अशा बऱ्याच अडचणीमुळे शाळा भरल्या नाहीत.'
- साधना दातीर, अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ
'शाळा सुरु व्हायला हवी होती. काही पालकांनी सहमती दर्शवली होती. तर काही पालक संभ्रमात असले तरी, मुलांची शाळेत जाण्याची इच्छा होती.'
- शरद तोरणे, शिक्षक श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, इंद्रायणीनगर
'मी दोन्ही मुलांसाठी संमतीपत्र भरले होते. मुलांचीदेखील तयार केली होती. पण स्थानिक प्रशासनाच्या निर्णयामुळे शाळा उघडलीच नाही.'
- वैजूनाथ शिंदे, पालक
'घरात बसून कंटाळलो आहे. शाळा सुरु होणार म्हणून मी खुप आनंदी होतो. मित्र भेटणार होते.'
- प्रतिक शिंदे, विद्यार्थी
एकूण शाळा - 658
- नववी ते बारावीच्या शाळा - 282
- नववी ते बारावी विद्यार्थी संख्या - 92 हजार 842
- शिक्षक संख्या - 4 हजार 900
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.