पुणे : "आपण एकटे आहात, असे चुकूनही मनात आणू नका.कोसळलेल्या आभाळावर पाय देऊन आपल्याला उभे राहायचे आहे. स्वतःसाठी, परिवारासाठी, आपल्याला सोडून गेलेल्याच्या सन्मानासाठी. हे कठिण आहे, पण अशक्य अजिबात नाही. दीपोत्सवाचा संदेशच मुळात अंधारावर मात करण्याचा आहे. प्रकाशवाटेची चाहूल लावणाऱ्या या उत्सवातून आपण प्रेरणा, स्फुर्ती घ्यावी. तेजानं झळाळून पुढे चालावे. अवघा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे...,''अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांना दिवाळीनिमित्त आधार दिला आहे. गृहमंत्र्यांचे हे पत्र स्वतः पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी निधन झालेल्या पोलिस कुटुंबाची भेट घेऊन त्यांना देत त्यांना उभारी दिली.
कोरोना कालावधीमध्ये कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. आता दिवाळीमध्ये निधन झालेल्या आपल्या कुटुंबप्रमुखांची आठवण त्या पोलिस कुटुंबाला आल्याशिवाय राहणार नाही. नेमका हाच धागा पकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा कुटुंबांना खास पत्र लिहून भावनिक आधार दिला आहे. कोरोनामुळे निधन झालेले पोलिस अधिकारी दिलीप लोंढे यांच्या पत्नी उषा लोंढे यांना देशमुख यांनी पत्र लिहीले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः लोंढे कुटुंबाची सोमवार पेठेतील त्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन भेट घेत, त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधत त्यांच्याकडे गृहमंत्र्यांचे पत्र सुपुर्द केले. गृहमंत्र्यांचे पत्र आणि तेही थेट पोलिस आयुक्त घेऊन आल्याने लोंढे कुटुंबीयही काही क्षण गहिवरले.
"पोलिस दलाने दाखविलेल्या संवेदनशिलतेमुळे आमच्या कुटुंबाला जगण्याचे बळ मिळाले आहे. गृहमंत्री व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली आहे.'' अशी भावना उषा लोंढे यांनी व्यक्त केली. तर "तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात संपूर्ण पोलिस दल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.'' असा विश्वास पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णु ताम्हाणे, विनोद पवार आदी उपस्थित होते.
"दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या प्रकाशवाटेवर चालण्यासाठी आपली वाट सुखकर व्हावी, यासाठी मी प्रयत्न करतोय. कोरोनामुळे आपल्याला सोडून गेलेल्यांची सेवा कायम असेपर्यंत, पोलिस सेवेसाठी मिळालेले घर कायम राहावे, यासाठीच निर्णय घेतला आहे. आपला उबदार निवारा पूर्ववत कायम राहणार आहे. नियमाप्रमाणे आर्थिक मदतही तुमच्यापर्यंत पोचली असेलच. काही तांत्रिक अडचण येणार नाही. तरीही काही समस्या आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा.''
- अनिल देशमुख, गृहमंत्री.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited By : Ashish N. Kadam)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.