हडपसर : महाराष्ट्र ही संतांची, पंडितांची व शाहिरांची भूमी असून ती साहित्यासाठी सकस आहे. साठोत्तरी काळातील साहित्यात वास्तव जीवन मोकळेपणाने व्यक्त झाले. त्यातून शोषितांचे जीवन व्यक्त झाले. नव्या लेखकांनी आता आपल्या लेखणीतून नवा समाज उभा केला पाहिजे, असे मत नेदरलँडचे महाराष्ट्रीयन कवी व चित्रकार भास्कर हांडे यांनी व्यक्त केले.
येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या मराठी विभागाने "मराठीतील १९६० नंतरचे विविध वाड्मयीन प्रवाह व सद्यस्थिती" या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन कवी व चित्रकार भास्कर हांडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे लेखापरीक्षक प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे हे अध्यक्षस्थानी होते.
वेबिनारचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, "साठोत्तरी कालखंडातील दलित, आदिवासी, ग्रामीण, स्त्रीवादी, मुस्लिम हे साहित्यप्रवाह मानव मुक्तीसाठी निर्माण झाले आहेत. मानव मुक्ती हाच या साहित्याचा ध्येयवाद आहे. मानव मुक्तीसाठी कवी, लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय माणूस एकमेकाला जोडला गेला पाहिजे. बुद्ध,महावीर,पैगंबर यांच्या प्रेरणेने निर्माण होणारे साहित्य हे विश्व नागरिकत्वाची संस्कृती जन्माला घालण्यासाठी निर्माण झाले आहे. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता जोपासण्यासाठी साठोत्तरी वाङ्मय निर्माण झाले आहे. यातून विश्वात्मक माणूस तयार होईल.
कलावंत हा माणसाच्या कल्याणाचा विचार करतो. तो शांतीचा प्रतीक असतो. साहित्य माणसाला जोडण्याचे काम करते. साहित्य सुखाची पेरणी करते. एकविसाव्या शतकात महात्मा फुले, डॉ.आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या प्रेरणेने दलित साहित्य लिहिले गेले. दलित साहित्याची कोंडी आदिवासी साहित्य प्रवाहाने फोडली. मुस्लीम साहित्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार व्यक्त होत आहे. साने गुरुजींनी जगावर प्रेम करा, असे सांगितले तर येशू ख्रिस्त शत्रूवर सुध्दा प्रेम करा असे सांगतात. अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे हे विश्वात्मक पोवाडे आहेत. या शतकात सर्व धर्मियांना शांतपणे जगावे लागेल. एकमेकांना समजुन घ्यावे लागेल .स्त्रीवादी साहित्यातून स्त्री-पुरुष विषमता दूर झाली पाहिजे हा विचार मांडला गेला आहे.'
विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, गोवा विद्यापीठाचे डॉ. चिन्मय घैसास, डॉ.तुकाराम रोंगटे, डॉ. सुधाकर शेलार ,अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे डॉ. ताहेर पठाण डॉ. शैलेश त्रिभुवन डॉ. संदीप सांगळे यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली. वेबिनारसाठी ७७२ संशोधक अभ्यासकांनी नाव नोंदणी केली होती.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. नम्रता मेस्त्री, प्रा. प्रांजली शहाणे, संदीप वाकडे, डॉ. विश्वास देशमुख, डॉ. अतुल चौरे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. संजय जडे, आय.क्यू. ए. सी. चेअरमन डॉ. किशोर काकडे यांनी संयोजन केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.