‘वहिनी, अहो तुम्हाला कळलं का? अहो शेजारच्या पावशेंची मिनल किराणा दुकानदाराचा हात धरून पळून गेली. आपल्याला काय करायचंय म्हणा!’ सुजाताने सुमनवहिनींच्या कानाला लागत म्हटले.
‘वहिनी, अहो तुम्हाला कळलं का? अहो शेजारच्या पावशेंची मिनल किराणा दुकानदाराचा हात धरून पळून गेली. आपल्याला काय करायचंय म्हणा! ’’ सुजाताने सुमनवहिनींच्या कानाला लागत म्हटले.
‘नशीब काढलं हो पोरीनं. किराणा दुकानदारांचं स्थळ हल्ली लाखात एकीलाच मिळतं. लॉकडाउनच्या काळात सगळे घरी बसले होते पण किराणा दुकानदार खोऱ्याने पैसा ओढत होते आणि आता तर काय! किराणा दुकानात वाईन मिळतेय. आता काय तिची पाचही बोटे वाईनमध्येच.’’ सुजाताने कौतुकानं म्हटलं.
आपला पहिलाच बॉल ‘वाईड’ पडल्याने सुजाता नाराज झाली.
‘वहिनी, तुम्हाला कळलं का? तिसऱ्या मजल्यावरील कोर्लेकर दारू पिऊन काल गटारात पडले होते. कोर्लेकरबाई तर लई नाकानं कांदे सोलते. माझा नवरा ‘अऽऽसा’ आहे आणि माझा नवरा ‘तऽऽऽसा’ आहे. मी बाई नसते कोणाच्या अध्यात ना मध्यात. पण डोळ्यांना दिसतं म्हणून बोलते. आपल्याला काय करायचंय म्हणा.’’ सुजाताने म्हटले.
‘कोर्लेकर यांच्यापर्यंत दुकानातील ‘वाईन’ची माहिती पोचली नाही वाटतं.’’ सुमनवहिनींनी म्हटले.
‘वहिनी, तुम्हाला कळलं का? खालच्या मजल्यावर बनचुके म्हणून एक कुटुंब राहायला आलंय. त्या बाई दर दोन तासाने ‘मला थोडी साखर द्या, मला थोडं दूध द्या, मला थोडं तेल द्या,’ असं सारखं मागत असतात. हल्लीच्या काळात असं कोणी वागतं का? बरं एकदा उसनं नेलं तर परत आणून देण्याची त्यांना सवय नाही. हल्ली लोकांना उसनं-पासनं मागायला काहीच कसं वाटत नाही. आपण मात्र शेजारधर्म निभवायला जातो. मात्र, ते आपल्याच अंगलट येतं. तसं मी त्यांना आतापर्यंत काही दिलं नाही म्हणा !. मी बाई लगेच कोणावर विश्वास नाही टाकत. काल बनचुकेबाई वाटीभर साखर मागायला आल्या होत्या. मग मी म्हटलं. ‘असं सारखं उसनं मागण्यापेक्षा माझ्याच घरी चहा प्यायला आणि जेवायला येत जा की. मला काय तुमच्या तीन माणसांचं करायला जड जाणार नाही. ‘एवढं काय टाकून बोलायला नको’ असं म्हणून त्या रागानं निघून गेल्या. जाऊ द्या! आपल्याला काय करायचं म्हणा.’’ सुजातानं म्हटलं. त्यानंतर पुढील दोन तास सुजाता ‘वहिनी, तुम्हाला हे कळलं का?’
आणि ‘ते कळलं का?’ असं म्हणत इकडची माहिती तिकडं करू लागल्या.
शेवटी सुमनवहिनी म्हणाल्या, ‘‘अगं सुजाता, तू सकाळी सकाळी काय काम काढलं होतंस. बोलण्याच्या नादात आपण दोघीही विसरून गेलो. त्यावर सुजाता एकदम ओरडली.
‘अगं बाई ! मी तर विसरूनच गेले. वहिनी, मला थोडी वाटीभर वाईन देता का? आमचा किराणा अजून भरला नाही. आमच्या यांना सकाळी झोपेतून उठल्या उठल्या थोडी वाईन पिल्याशिवाय त्यांचे डोळेच उघडत नाही. त्यामुळे वाईन न मिळाल्याने त्यांनी घरात नुसता गोंधळ घातला असेल. जाऊ द्या! आपल्याला काय करायचंय म्हणा!’’ सुजाताने वाटी सुमनवहिनींकडे देत म्हटले. त्यानंतर वहिनी वाटी घेऊन किचनमध्ये गेल्या व येताना एक कागद घेऊन आल्या.
‘सुजाता, गेल्या महिनाभरात तू उसने म्हणून नेलेल्या वस्तूंची ही यादी आहे. साखर ः दोन किलो, तेल ः एक लिटर, दूध ः तीन लिटर, मेथी व कोथिंबिरीच्या प्रत्येकी चार जुड्या. या गोष्टी दिल्याशिवाय मी वाटीभर वाईन देणार नाही.’’ वहिनींनी ठामपणे सांगितले.
‘काय बाई ! उसन्या म्हणून नेलेल्या वस्तूंची कोणी नोंद करतं का? हल्ली शेजारधर्मच राहिला नाही. जाऊ द्या! आपल्याला काय करायचं म्हणा.’’ असे म्हणत सुजाता पाय आपटीत वाटी घेऊन दुसऱ्या शेजारणीकडे गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.