पुणे - ताप, थंडी, सर्दी, खोकल्यापासून पोटाचे विकार आणि वंध्यत्वावरील औषधांसह काही प्रतिजैविकांची कंपन्यांनी निर्यात करू नये, असा फतवा केंद्र सरकारने मंगळवारी काढला. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे चीनमधून औषधाच्या कच्च्या मालाची आयात थांबल्याने देश औषध तुटवड्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला.
भारतातील औषध निर्माण कंपन्यांना आवश्यक कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे चीनमधून कच्चा माल ही निर्यात झालेला नाही. तसेच, भारतानेही चीनबरोबरचे आयात-निर्यात धोरण या उद्रेकामुळे बदलले आहे. त्या सर्वांचा परिणाम देशातील औषध निर्माण कंपन्यांवर होत असल्याची माहिती पुढे आली.
ब्रिंटॉन फार्मास्युटिकल्सचे मालक राहुल दर्डा म्हणाले, ‘‘औषधाच्या उत्पादनासाठी अत्यावश्यक कच्च्या मालाची आयात बंद झाली आहे. त्यामुळे औषध तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल तसेच, त्यापासून तयार झालेली औषधांची निर्यात काही काळासाठी थांबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच स्त्रीरोग, वंध्यत्व, पोटाच्या विकारावरील औषधांसह काही प्रतिजैविकांचा त्यात समावेश आहे.’’
औषधाच्या किमतीवर त्यामुळे कोणताही थेट परिणाम सध्या दिसत नाही. मात्र, त्यामुळे औषध उत्पादक कंपन्यांना कच्च्या मालासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
औषध उत्पादक कंपनीच्या संदर्भातील जोश कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख आर. बी. जोशी म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवनात अत्यावश्यक अशा बहुतांश औषधांची निर्यात थांबविण्यात आली आहे. देशातील लोकांना औषधे सहजतेने उपलब्ध व्हावीत, त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही औषधे बहुतांश देशांमध्ये उत्पादित केली जातात. काही अविकसित देश मात्र भारताकडून ही औषधे खरेदी करतात. त्यांना याचा फटका बसेल.’’
नेमके काय झाले?
कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे चीनमध्ये सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. तेथील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. त्याच वेळी भारतानेही चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर सध्यातरी बंदी घातली आहे. आपल्या देशातील औषध कंपन्या औषध निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या घटकांचा मोठा साठा करत नाहीत. आलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून औषध उत्पादन करायचे आणि पुन्हा मागणीनुसार नव्याने कच्च्या मालाची आयात करायची, अशी पद्धत आपल्याकडे आहे. प्रतिजैविकांबाबतही हेच धोरण आहे. त्यामुळे त्याचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.