पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा कोण करणार यावरून महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद सुरू झालेला असताना केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्याची हद्दवाढ झाली आहे, त्यामुळे आणखी काही गावे घेऊन दोन महापालिका कराव्यात अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान, गेल्या साडे चार वर्षात भाजप आणि आरपीआयने चांगल्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेत आमचीच सत्ता येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे पुणे महापालिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देण्यात आला. रामदास आठवले यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत आठवले होते. उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृहनेते गणेश बीडकर, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी यावेळी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, ‘‘कोरोनाचा सामना करण्यात पुणे महापालिकेला यश आले आहे. बेड, ऑक्सिजन, औषधे मिळवून देणे, रुग्णालय उभे करणे अशी कामे केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यशस्वीपणे कोरोना काळात काम केले. रोज चव्वा चार लाख केसेस येत असल्याने नकारात्मक चर्चा होत होती, पण या काळात मोठी यंत्रणा उभी केली आहे. तिसरी लाट आली तरी त्यासाठी सक्षम यंत्रणा आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन राज्यांना देखील मदत केली आहे.
पुण्यात एसआरए योजना करताना ती बिल्डरांना परवडत नाही, त्यामुळे ४.५ एफएसआय दिल्यास अनेक ठिकाणच्या योजना मार्गी लागतील. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आरपीयआच्या उमेदवारांनी मित्र पक्षाचे चिन्ह वापरले तर आम्हाला फायदा होईल. पण विधानसभेसाठी आमचे स्वतंत्र चिन्ह असेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.