ब्रिटिश नंदी
दोन हजाराची नोट नावाची एक चीजवस्तू बाजारात (काही लोकांकडे) उपलब्ध होती, व ती आता (हळू हळू) बंद होणाराय, असे वृत्त आल्याने काही लोकांचे पित्त उगाचच्या उगाच खवळले आहे. निदान आम्ही तरी ही दोन हजाराची नोट उभ्या आयुष्यात नीटशी पाहिलेली नाही. ती साधारणत: गुलाबी रंगाची असते, असे सांगितले जाते.
गुलाबी रंगाचा आणि आमचा आयुष्यातच फारसा संबंध आला नाही, हे खेदाने सांगावे लागते. ना आम्हाला कधी गुलाबी कागदांवर लिहिलेली पत्रे मिळाली, ना कधी नोट दिसली. मुदलात दोन हजाराची नोट ही वस्तु काल्पनिक होती, असेच आम्हाला इतके दिवस वाटत होते.
परंतु, परवा पू. नमोजी यांच्या कृपेकरोन येत्या चार महिन्यात ही नोटदेखील गायब होणार, असे कळले तेव्हा आम्हाला अचंबाच वाटला. दोन हजाराच्या नोटेसंदर्भात काही एफेक्यू (फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स) ऊर्फ वा. वि. जा. प्र (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) आणि त्यांची उत्तरे आम्ही येथे देत आहो :
प्रश्न : का हो, दोन हजाराची नोटही जाणार?
उत्तर : जाणार काय? कधीच गेली! खुळेच आहात!!
प्रश्न : दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी काय करावे?
उत्तर : नोटा बदलायची ही योजना नाही! तुमच्याकडे नोटा असतील, त्या आमच्याकडे आणून द्या, एवढंच सांगणारी ही योजना आहे!
प्रश्न : दोन हजाराची नोट बदलायची झाली, तर ब्यांकेत ओळखपत्र दाखवावे लागेल का?
उत्तर : नाही! ओळखपत्राची गरज नाही, परंतु ब्यांकांमध्ये हल्ली सीसीटीव्ही क्यामेरे असतात. शिवाय दोन हजाराची नोट तुम्ही ब्यांकेत भरणा करण्यासाठी खिशातून बाहेर काढली रे काढली की इतर खातेदार तुमच्याकडे विस्मयाने पाहणार! त्यातले काही तुमच्यासोबत सेल्फी घेण्याचीही शक्यता आहे. तेव्हा सावधान!
प्रश्न : गेल्या नोटबंदीचे काय झाले?
उत्तर : तुम्ही मॅट्रिक पास आहात का? असाल असं गृहित धरु! त्यामुळे तुमचा काय फायदा झाला? तुम्हाला सतराचा पाढा येतो का? प्रयत्न करु नका, येत नाही, याची खात्री आहे आम्हाला! पण त्यामुळे तुमचं काय अडलं? तसंच हे...दोन हजाराची नोट गेल्यानं तुमचं काहीही अडणार नाही, याची हमी तुमच्या नशिबानंच घेतलेली आहे! नेक्स्ट क्वेश्चन प्लीज!
प्रश्न : (पडेल आवाजात) गेल्या नोटबंदीचे काय झाले, हा आमचा प्रश्न होता, तुम्ही उत्तर कुठे दिले?
उत्तर : तुमच्या खिशात शंभराची नोट आहे का? असेल तर नशीब चांगलं आहे, समजा! असले प्रश्न विचाराल तर तीही गायब करु!
प्रश्न : वारंवार नोटबंदी केल्याने काय साधते?
उत्तर : हां, हा चांगला प्रश्न विचारलात! या प्रश्नाचं उत्तर थोडंसं अध्यात्मिक आहे. वारंवार नोटबंदी केल्याने माणसाला अनेक लाभ होतात. एक म्हणजे जीवन असार आहे, अशी भावना बळावते. संचयाची भूक मरते, आणि कश्शातच रस वाटेनासा होतो.
कंदमुळे खाण्याचीही मानसिक तयारी होते. साऱ्या दु:खाचे मूळ हे या संचयाच्या भावनेत आहे. आमच्या ओळखीच्या एका माणसाने नोटबंदीनंतर शेपूची भाजीदेखील आवडीने खायला सुरवात केली. इडलीसांबारालाही नावं ठेवणारा इसम नोटबंदीनंतर सांबारातला भोपळाही आवडीने खाऊ लागला! ही एक प्रकारची विरक्ती असते. रानात जाऊन तपश्चर्या केल्याने एग्झॅक्टली हेच परिणाम होतात. प्रपंचात राहून अध्यात्मिक पातळी गाठायची असेल तर नोटबंदीसारखं व्रत नाही! तात्पर्य, वारंवार नोटबंदीमुळे माणसाचे मन शुद्ध होते. नोटबंदी नमो नम:!!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.