Pratapgad Sugar Factory Election
Pratapgad Sugar Factory Election esakal
सातारा

'प्रतापगड'ची निवडणूक बिनविरोध? आजी-माजी आमदारांच्या भूमिकेकडं लक्ष

महेश बारटक्के

नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेल्या दीपक पवारांनी दंड थोपटल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे.

कुडाळ (सातारा) : जावळी तालुक्याचे सहकार मंदिर व तालुक्याची अस्मिता म्हणून ओळख असणाऱ्या सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा (Pratapgad Cooperative Sugar Factory Election) पंचवार्षिक निवडणुकीचा कायर्क्रम जाहीर झाला असून, ११ फेब्रुवारीअखेर अर्ज दाखल करावयाचे असल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र सभासदांना मतदानाची संधी मिळणार असल्याने, पुन्हा एकदा टोकाचा संघर्ष होतो की निवडणूक बिनविरोध होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘प्रतापगड’ची उभारणी संस्थापक माजी आमदार (कै.) लालासिंगराव शिंदे व त्यांचे सुपुत्र (कै.) राजेंद्र शिंदे यांनी मोठ्या कष्टाने व हिमतीने केली. स्थापनेपासून कारखान्यावर (कै.) लालासिंगराव शिंदे गटाचे वर्चस्‍व अबाधित आहे. त्यांच्या पश्चात (कै.) राजेंद्र शिंदे व सध्या श्रीमती सुनेत्रा शिंदे व त्याचे सुपुत्र सौरभ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली कारखान्याचा कारभार सुरू आहे. कारखाना गटावर पहिल्यापासून शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचा पगडा असून, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध नव्याने राष्ट्रवादीत (NCP) दाखल झालेले व सौरभ शिंदे (Saurabh Shinde) यांचे पारंपरिक विरोधक समजले जाणारे दीपक पवार (Deepak Pawar) यांनीही दंड थोपटल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. या सगळ्यात आमदार भोसले व आमदार शिंदे या तालुक्याच्या आजी-माजी आमदार गटाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

कोरोनामुळे काही महिन्यांची मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाला आता निवडणुकीची (Pratapgad Sugar Factory Election) तयारी सुरू करावी लागणार आहे. ‘प्रतापगड’च्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये व्यक्ती व ऊस सभासद गटातून एकूण १५ जागा आहेत. त्यामध्ये कुडाळ, खर्शी-सायगाव, हुमगाव, मेढा, महाबळेश्वर अशा पाच गटांतून संचालक मंडळाच्या प्रत्येकी तीन जागा आहेत. उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था एक, महिला राखीव दोन, अनुसूचित जाती-जमाती राखीव एक, विमुक्त जाती व भटक्या जमाती राखीव एक, इतर मागास प्रवर्ग एक अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. एकूण सहा हजार सभासद आहेत. त्यापैकी किमान एक हजार सभासद हे मृत आहेत. सध्या कारखान्यावर श्रीमती सुनेत्रा शिंदे व सौरभ शिंदे यांचेच वर्चस्‍व असून, गत पंचवार्षिक निवडणुकीत दोन जागांचा अपवाद वगऴता कारखाना गटाला त्यावेळची निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले होते. वास्तविक प्रतापगड कारखाना हा मोठ्या आर्थिक संकटात असल्याने गेल्या आठ वर्षांपूर्वीच प्रतापगड कारखान्यावर लिलावाची वेळ आली होती. मात्र, सुनेत्रा शिंदे यांनी कारखाना सहकारात राहावा, या उद्देशाने शर्तीचे प्रयत्न करून कारखाना भुर्इंज येथील किसन वीर साखर कारखान्याला १६ वर्षांसाठी भाडेतत्त्‍वावर चालवण्यास दिला. सुरवातीची काही वर्षे कारखाना सुरळीत चालला. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून कारखाना बंद आहे.

कारखाना बंद असल्याने येथील स्थानिक सभासदांचा व शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न गंभीर झाला असून, जावळीतील ऊस उत्पादकांना अजिंक्यतारा साखर कारखाना, जरंडेश्वर कारखाना व शरयू या तिन्ही कारखान्यांकडे ऊस गाळपासाठी पाठवावा लागत आहे. सध्या ‘प्रतापगड’ची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत असून, संस्थेवर कर्जांचा बोजाही मोठ्या प्रमाणात आहे. किसन वीर कारखान्याची स्वतःचीच अवस्था डबघाईला आल्याने ‘प्रतापगड’चे भवितव्यही अंधारातच आहे. अशात प्रतापगड कारखान्याच्या व्यवस्थापनाने ‘किसन वीर’सोबतचा करार मोडून टाकण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असताना कारखान्याची निवडणूक लागली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत असलेल्या कारखान्यावर पुन्हा एकदा निवडणूक लादली गेल्यास कारखान्यावर आणखी आर्थिक बोजा वाढणार आहे, ही वस्तुस्‍थिती कोणालाही नाकारता येणार नाही. यासाठी तालुक्यातील सर्व पक्ष, गट-तटांनी एकत्र येऊन ही संस्था वाचवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचा सूरही सुज्ञ सभासद शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे आणि म्हणूनच कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तसे न झाल्यास येत्या २८ फेब्रुवारीपासून निवडणुकीची खरी प्रक्रिया सुरू होणार आहे. गरज पडल्यास १३ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

दरम्यान, निवडणूक जाहीर होताच पहिल्याच दिवसापासून सौरभ शिंदे व दीपक पवार या दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपाला सुरवात झाल्याने निवडणूक टोकाची होणार, याची झलक दिसून आली आहे. या सगळ्या राजकारणात आता आमदार शिंदे यांचा गट काय भूमिका घेतो? याची सगळ्यांना उत्सुकता आहे. कारखान्याच्या लढाईत यापूर्वी कारखाना गट व शशिकांत शिंदे गट अशीच लढाई होत आली आहे. मात्र, सध्या जावळीच्या राजकारणात उलथापालथ झाली असल्याने कोण कोणाशी जुळवून घेतो व कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढाई करतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यासोबत राहून तालुक्यातील अनेक निवडणुकीत कारखाना गटाने त्यांना सहकार्य केल्याने सध्या ते भाजपमध्ये असले तरी सौरभ शिंदे यांनाच ताकद देऊन करखान्यासाठी मदत करतील, अशीच शक्यता जास्त आहे. तर शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे जावळी तालुक्यात बेरजेचे राजकारण करण्याच्या उद्देशाने निवडणुकीत लक्ष घालण्याची शक्यता कमी असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना ते काय कानमंत्र देतात, यावर कारखाना निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT