Crop Insurance
Crop Insurance sakal
उत्तर महाराष्ट्र

Crop Insurance : पीकविमा कंपनीच्या कारभाराने शेतकरी हैराण; असून अडचण, नसून खोळंबा!

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतीचे नुकसान झाल्याच्या घटनेला वर्ष उलटत आले तरी शेतकऱ्यांना पीकविमाच नव्हे, तर साधी पंचनाम्याची प्रतही हाती मिळाली नसल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात घडला आहे.

(farmers not get crop insurance but also copy of simple Punchnama of crop damage dhule news)

पंचनाम्याची प्रत नसल्यामुळे कोणत्याच प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सोय शेतकऱ्याना उरलेली नाही. कंपनीच्या मनमानी कारभाराला कोण लगाम घालणार, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

येथील महिला शेतकरी उषा साळुंखे यांची भरवाडे (ता. शिरपूर) शिवारात शेती आहे. त्यांनी २०२२ मध्ये खरीप हंगामासाठी मुगाची लागवड केली होती. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत त्यांनी पिकाचा विमा घेतला. त्यापोटी शेतकऱ्याचा वाटा निश्चित केलेली रक्कम भरली. दरम्यान, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे मुगाचे नुकसान झाले.

त्यांचा मुलगा नीलेश पाटील यांनी विमा काढण्यासाठी नियुक्त संबंधित पीकविमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधून माहिती दिली.

कंपनीने त्यांच्याकडे नुकसानीच्या पाहणीसाठी प्रतिनिधी पाठविला. त्याने पाहणी केल्यानंतर नीलेश पाटील यांनी पंचनाम्याची प्रत मागितली. ती दोन-तीन दिवसांत देतो, असे सांगून प्रतिनिधी निघून गेला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मात्र आजतागायत नीलेश पाटील यांना पंचनाम्याची प्रत मिळू शकली नाही. आपल्याला विमा मंजूर झाला किंवा नाही याबाबत त्यांना कळविण्यात आलेले नाही. पंचनाम्याची प्रतही मिळत नसल्यामुळे न्यायालय किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सोयही त्यांच्याकडे उरली नाही.

पंचनामा न करताच विमा

भटाणे (ता. शिरपूर) येथील योगेश भाईदास शिरसाट यांच्याबाबत तर वेगळाच प्रकार घडला. त्यांची तऱ्हाडकसबे (ता. शिरपूर) शिवारात शेती आहे. त्यांनी खरिपात एक हेक्टर ४१ आर क्षेत्रावर कापूस लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे त्यांचेही नुकसान झाले.

त्यांनी ऑनलाइन तक्रार दिल्यानंतर त्यांना नुकसानभरपाई म्हणून साडेआठ हजारांपर्यंतची रक्कम मंजूर झाल्याचे दर्शविण्यात आले. मात्र ही रक्कम त्यांना अद्याप मिळू शकली नाही.

विशेष म्हणजे शिरसाट यांच्या शेताचा कोणताच पंचनामा झालेला नाही. शिरसाट यांनी कापसासाठी एकूण ७० हजार ५०० रुपयांचा संरक्षित विमा घेतला असून, त्यापोटी तीन हजार ५२५ रुपये भरले आहेत. विम्याच्या हप्त्यात राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी एक हजार ४१० रुपयांचा वाटा उचलला आहे.

म्हणजे सहा हजार ३४५ रुपये भरून नुकसान झाल्यानंतर विम्याचा परतावा साडेआठ हजार रुपये देणे कोणत्या हिशेबात बसते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आठ महिन्यांहून अधिक काळ पाठपुरावा करूनही शिरसाट अद्याप विम्यापासून वंचित आहेत.

टोल फ्रीचे त्रांगडे

नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला सूचित करणे बंधनकारक आहे. मात्र त्यासाठी दिलेला टोल फ्री नंबर दोन दिवस उचलण्यात येत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. काहींनी विमा प्रतिनिधींशी वैयक्तिक संपर्क केला असता त्यांना विशिष्ट अ‍ॅप डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला.

साधा मोबाईल वापरणारे शेतकरी तंत्रस्नेही असतील का याचा विचारही संबंधितांनी केला नाही. शेतातील हानी सोसायची, विम्याच्या रकमेसाठी दगदग करायची आणि तरीही पदरी मनस्ताप येत असेल तर विम्याचा उपयोगच काय, असा प्रश्न त्रासलेले शेतकरी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT