इगतपुरी (जि. नाशिक) : जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू झाल्या. मात्र, शालेय पोषण आहारांतर्गत दिली जाणारी पौष्टिक खिचडी विद्यार्थ्यांना मिळत नव्हती. त्यातच ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ या सहा महिन्यांचा शिधा विद्यार्थ्यांना मिळालेला नव्हता. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थी शाळेत नियमित येण्याचे प्रमाण घटले होते. त्यातच त्यांना पोषणमूल्ये मिळत नसल्याने पालकांची नाराजी होती. या पार्श्वभूमीवर ‘पोषण आहारातील पौष्टिक खिचडी कधी?’ या आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध झाले होते.
कोरोनापूर्वी (Corona) शालेय पोषण आहारांतर्गत राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी पौष्टिक खिचडी शिजवून देण्यात येत होती. मात्र, कोरोनाकाळात शाळाच बंद असल्याने खिचडीऐवजी विद्यार्थ्यांना दर महिन्याला तांदूळ आणि कडधान्ये देण्याचा निर्णय झाला. तसेच ऑगस्ट २०२१ मध्ये अतिरिक्त पोषणमूल्य असलेल्या 'न्यूट्रिटिव्ह स्लाइस' (स्पेशली डिझाइन प्रोटिन बिस्किट) देण्याचा निर्णय झाला.
प्रत्यक्षात एका महिन्यासाठी ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना साधारण सहा महिन्यांचा शिधा मिळाला नाही. तो आता देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, त्या कुटुंबातील मुले शालेय पोषण आहारासाठी शिक्षण घेतात. त्यातून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण होते. साधारण दोन वर्षांपासून शाळेत मिळणारी खिचडी बंद झाली होती. ती आता सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल
‘पोषण आहारातील पौष्टिक खिचडी कधी?’ या आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची जिल्हा प्रशासनाने दखल घेत प्रथमत: आदिवासी व दुर्गम भागातील शाळांना तांदळासह कडधान्यांचे वाटप केले असून, इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना खिचडी व इतर पूरक पोषण आहार मिळू लागल्याने पालकांतही समाधानाचे वातावरण आहे .राज्यात ‘मिड डे मिल’ (मध्यान्ह भोजन) योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २००८-०९ मध्ये सुरू झाली. केंद्र सरकार पुरस्कृत या योजनेसाठी हजारो रुपयांचे अनुदान दिले जाते. शाळेत कोणतेही मूल कुपोषित राहू नये, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ही योजना सुरू झाली.
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थी पोषण आहाराच्या निमित्त शाळेत येतात. या आहारातून त्यांना प्रथिने मिळून, त्यांची योग्य वाढ होते. त्यांना शाळेत दिलेली खिचडी ते आवडीने खातात, अशी आमची पाहणी आहे. शालेय विद्यार्थ्यांचे पोषण होण्यासाठी त्यांना शाळेतच कायम पौष्टिक खिचडी देण्यात यावी, अशी इच्छा आहे. - प्रकाश गांगड, पालक, पत्र्याचीवाडी (ता. इगतपुरी)
''ग्रामीण भागातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, यासाठी शालेय पोषण आहारांतर्गत पौष्टिक खिचडी देण्यात येते. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो. लॉकडाउन असताना खिचडीऐवजी शिधा देण्याचा निर्णय झाला. मात्र, त्याऐवजी मुलांना खिचडीच जास्त आवडते. आता पुन्हा खिचडी मिळू लागल्याने मुलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.'' - नामदेव धादवड, शिक्षक, चिंचलेखैरे, ता. इगतपुरी
''दोन वर्षापासून आम्हाला शाळेत खिचडी मिळत नव्हती. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटत नव्हते. आता मात्र शाळेत खिचडीसह पूरक आहार मिळत असल्याने शिक्षणात व शाळेत गोडीचे वातावरण अनुभवयाला येत आहे.'' - योगिता भले, विद्यार्थिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.