येवला (जि. नाशिक) : शेतकऱ्याच्या मालाला कधीतरी दोन रुपये जास्तीचे मिळाले की सगळ्यांनाच ते दिसते, पण इतर वेळेस त्याच्या वेदना व दुःख मात्र बेदखल होतात. पाणी आहे, पण वीजपुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी देणे मुश्किल बनले. त्यातच निसर्गही साथ देत नसल्याने करपा रोगाचा (Karpa disease) प्रादूर्भाव झाल्याने पिकाची वाताहात झाली, म्हणून वैतागलेल्या ठाणगाव येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतातील उभे कांदे जाळले. विशेष म्हणजे आठवड्यापूर्वीच या गावात एका शेतकऱ्याने याच कारणांमुळे शेतातील कांद्यांची नांगरणी केली होती.
सुरवातीला कांद्याला (Onion) चांगला भाव मिळाला, पण आता शेतकऱ्यांचा माल येऊ लागताच दर घटले. त्यातच निसर्गही नेहमीच पिकांवर आणि शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याने शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. याचमुळे संतापलेल्या ठाणगाव येथील सागर शेळके या तरुण शेतकऱ्याने शेतात उभ्या असलेल्या कांदा पिकाला स्वतःच्या हाताने आग लावून संताप व्यक्त केला. शेळके यांनी सुमारे सव्वाएकर क्षेत्रात कांदालागवड केली होती. कांदालागवडीसह निंदणी, खुरपणी, रासायनिक खते, औषधांसाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च केला. मात्र पीक ऐन जोमात असताना, निसर्गाचे दुष्टचक्र व अनियमित वीजपुरवठ्याला कंटाळलेल्या या शेतकऱ्याने पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
विहिरीत पाणी आहे, पण वीजपुरवठा खंडित राहत असल्याने पिकांना पाणी देणे जिकरीचे बनले आहे. त्यातच सततच्या खराब ढगाळ (Cloudy) हवामानामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढला आहे. यावरही नियंत्रणासाठी हजारो रुपयांची औषधे मारली, पण काहीही उपयोग झाला नाही. गेल्या एक ते दीड महिन्यापासून विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेतात उभे असलेले पीक डोळ्यादेखत जळत असल्याचे पाहावले न गेल्याने अखेर या शेतकऱ्याने स्वतःच्या नशीबाला दोष देत संतापून उभ्या पिकालाच आग लावून दिली. पावसाची कृपा झाल्याने विहिरीत मुबलक पाणी असूनही फक्त विस्कळित वीजपुरवठ्यामुळे पिकाला पाणी देता येत नसल्याने पिकावर चारा टाकून पेटवून देत उभे पीक नष्ट केले. गुंतवलेले पैसे दूरच पण अजून नुकसान होत असल्याने संतापून हे पाऊल उचलल्याचे शेतकरी शेळके सांगतात. दरम्यान, पिकांना मुबलक पाणी देता यावे, यासाठी दिवसातून किमान आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
साडेतीन एकरावर फिरविला नांगर
कांद्याचे सतत कोसळणारे भाव, तसेच मजुरीचे दर गगनाला भिडल्याने याचा ताळमेळ बसत नसल्याने ठाणगाव येथील शेतकरी रामदास गरूडे यांनी मागील आठवड्यात आपल्या उभ्या साडेतीन एकर पिकावर नांगर फिरवला. या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने उन्हाळा कांद्याचे पीक घेतले होते. मात्र, रोगाचा प्रादूर्भाव, निसर्गाचा लहरीपणा, मजुरांचे गगनाला भिडलेले भाव, सतत कोसळणारे कांद्याचे दर याचा ताळमेळ बसत नसल्याने संतप्त होत या शेतकऱ्याने आपला साडेतीन एकर कांदा पीक ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरून टाकत टोकाच पाऊल उचलले होते. एकाच गावात दोन आठवड्यांत दोन घटना घडल्याने शेतकऱ्यांची संतापाची भावना दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील उभे कांद्याचे पीकही सोडल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.