नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दिलेल्या निकालाचा आदर राखला जाणार असून, अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता.२८) पत्रकार परीषदेत स्पष्ट केले आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंशी वैयक्तिक भेट घेत, चर्चा करून परीक्षेच्या विकल्पांबद्दल चर्चा केल्यानंतर परीक्षेचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाणार असल्याचे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा देण्याचा पर्याय ऐच्छिक ठेवता येणार नाही
श्री. सामंत म्हणाले, की कोरोनाची सध्याची परीस्थिती लक्षात घेता परीक्षा घेणे शक्य नसल्याची भुमिका मांडली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात परीक्षा देण्याचा पर्याय ऐच्छिक ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरी युजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी यापूर्वी जाहीर केलेली ३० सप्टेंबरची अंतिम मुदत रद्दबाबत ठरविली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करून परीक्षेच्या स्वरूपाबद्दल काय मार्ग काढता येईल, याबद्दल विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ स्तरावर समिती
प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत वैयक्तिक स्तरावर चर्चा करणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. विद्यापीठ स्तरावर समिती स्थापन केली जाईल. समिती स्थापनेनंतर दोन ते तीन दिवसांत परीक्षेच्या विकल्पाबद्दल अहवाल मागविला जाईल. परीक्षा केंद्रावर परीक्षा घ्यावी, ऑनलाईन परीक्षा घ्यावी की ओपन बुक यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.
विद्यार्थ्यांना दिला जाईल पुरेसा वेळ
अंतिम वर्षाची परीक्षा होणार असली, तरी परीक्षापद्धती निश्चित झाल्यानंतर लगेच परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा अवधी दिला जाणार असल्याचे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?
सीईटी परीक्षांबाबत लवकरच निर्णय
सीईटी परीक्षा आयोजनासंदर्भातदेखील लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले आहे. जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी विचार सुरू आहे. यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना केवळ कागदपत्रांअभावी मुकावे लागण्याची वेळ येणार नाही. सध्याची परीस्थिती लक्षात घेता, कागदपत्र उपलब्धतेसाठी मुबलक वेळ दिला जाणार असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा
संपादन - किशोरी वाघ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.