नाशिक : (येवला) लॉकडाउन उठल्यानंतर अनेक मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे, हे गृहीत धरून जिल्हा परिषदेने मनरेगाच्या कामाचा ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. सुमारे एक हजार 931 कोटींच्या कामांचा आराखडा तयार केला आहे. मागणी होताच कामे देण्याचे नियोजन आहे. लॉकडाउन संपल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामांची मागणी होणार आहे. त्या अनुषंगाने प्रथमच विक्रमी कामांचा आराखडा तयार केला असून, कोणत्याही परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम मिळावे, अशी त्यामागची भूमिका आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी कामांच्या सूचना केल्या आहेत.
स्थानिकांकडून कामाची मागणी वाढण्याची शक्यता
2018-19 मध्ये जिल्ह्यात 75 कोटींची, तर 2019-20 मध्ये 57 कोटींची (17 कोटींची कमी) कामे झाली. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाहेर गेलेले साधारणतः 40 हजार नागरिक जिल्ह्यात आले आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिकमधून दर वर्षी स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. ते यंदा कामाअभावी होणार नाही. स्थानिक ठिकाणी कामे नसल्याने स्थानिकांकडून कामाची मागणी वाढणार असल्याचे गृहीत धरून त्यासाठी सुमारे 500 कोटींची कामे करणे आवश्यक आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचा वार्षिक आराखडा एक हजार 530 कोटींचा, तर वैयक्तिक कामाचा 643 कोटींचा असा एक हजार 931 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
अनेक कामे मंजूर करून देण्यात येणार
तालुकानिहाय गटविकास अधिकाऱ्यांना आराखड्यातील कामे तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळून होणारी शेतबांध बंदिस्ती, जमीन सपाटीकरण, शेळी गोठे, गाय गोठे, कोबा करणे, कुक्कुटपालन शेड, बांधावरील वृक्षलागवड, तुती लागवड, फळबाग लागवड, अशी अनेक वैयक्तिक कामे सुरू करण्याची सूचना दिली आहे. सर्व ग्रामरोजगारांना सहभागी करून घेऊन कर्ज मंजूर झालेल्या बचतगटाशी चर्चा करून शेळी गोठा, गायी गोठा, पोल्ट्री यार्ड अशी आणि इतर अनेक कामे मंजूर करून देण्यात येणार आहेत. अपूर्ण व प्रगतीत असलेली कामे तत्काळ सुरू केली जाणार आहेत.
दृष्टिक्षेपात...
-जिल्हा परिषदेच्या आराखड्यात एक लाख 43 हजार कामे व 46 लाख मनुष्य दिननिर्मिती. आराखडा एक हजार 531 कोटींचा.
-राज्यस्तरीय आराखड्यात 26 हजार 408 कामे, 14 लाख मनुष्य दिननिर्मिती आणि 401 कोटींचा आराखडा.
-एकूण आराखडा एक लाख 69 कामे, 60 लाख मनुष्य दिननिर्मिती आणि निधी एक हजार 932 कोटी.
हेही वाचा > धक्कादायक! रागाच्या भरात 'त्याचे' हात देखील थरथरले नाही...बायकोला तर पेटवलंच अन् स्वत:देखील...
मनरेगाच्या कामांची तयारी केली असून, आदिवासी तालुक्यातील मजुरांचे स्थलांतर होऊ नये, म्हणून त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, बागलाण, इगतपुरी या तालुक्यांत प्राधान्याने काम करणार आहे. अनेकांना रोजगार मिळावा, यासाठी वैयक्तिक कामांना प्राधान्य दिले आहे. कामांसाठी एनजीओची मदत घेतली जाणार आहे. - आर. आर. परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.