Satyajeet Tambe Exclusive
Satyajeet Tambe Exclusive esakal
नाशिक

Satyajeet Tambe Exclusive : 'सत्यजित तुमचा आहे तुमच्यासाठी काम करेल...' सत्यजित तांबेंचा मतदारांना शब्द

सकाळ वृत्तसेवा

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, 'गेले पंधरा दिवस जे सुरू आहे, ते आमच्या थोरात आणि तांबे कुटुंबाच्या विरोधात ठरवून केलेले राजकारण आहे.,’ सोबत आपले व्हिजन मांडताना ते म्हणाले, सरकारी भरतीसाठी दबावगट, बेरोजगार तरुणांसाठी फोरम, पदवीधरांसाठी हक्काचा माणूस म्हणून काम करणार. ‘सत्यजित तुमचा आहे आणि तो तुमच्यासाठी काम करेल’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

प्रश्नः बंड का केलं? तुमच्या उमेदवारीला नेमका कोणाचा विरोध होता?

सत्यजित तांबे : अत्यंत विनम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो, मी बंड केलेले नाही. माझ्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नव्हता. शिवाय आम्ही काँग्रेस श्रेष्ठींना राजकीय परिस्थिती पाहून वडील किंवा मी उमेदवारी अर्ज दाखल करेल असे स्पष्ट सांगितलेले होते. मात्र ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांचे नाव जाहीर झाले आणि एबी फॉर्म ही त्यांच्याच नावाचे आले, तांत्रिक अडचण झाली, आणि मला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला.

याला बंड म्हणता येणार नाही. मात्र त्यानंतर गेले पंधरा दिवस जे सुरू आहे, ते आमच्या परिवाराच्या विरोधात शत्रुत्वाच्या भावनेने व ठरवून केलेले राजकारण आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ निष्ठापूर्वक काँग्रेस सोबत राहिलेल्या आमच्या कुटुंबाला निष्ठा शिकवण्याची स्टंटबाजी काही मंडळींकडून सुरू आहे.

बावीस वर्ष मी निष्ठेने आणि रक्ताचे पाणी करून संघटनेत काम केले आहे, या असल्या आरोप प्रत्यारोपांनी तो संघर्ष पुसता येणार नाही. सध्या मी पूर्णतः निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. निकालानंतर आमच्या कुटुंबासोबत घडलेल्या राजकारणावर सविस्तर बोलेल.

प्रश्न : बाळासाहेब थोरात यांची आपल्या बाबत काय भूमिका आहे?

सत्यजित तांबे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आमचे मार्गदर्शक आणि कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी काँग्रेस कडूनच आपल्याला उमेदवारी करायची आहे, असे स्पष्ट सांगितले होते, माझ्या मनातही त्याबद्दल शंका नव्हती. मात्र एबी फॉर्म नसल्याने तांत्रिक अडचण झाली आणि मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली.

खांद्याला दुखापत झाली, त्यानंतर त्यांचे ऑपरेशन झाले आणि सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेत आहेत. आमच्या दृष्टीने त्यांची तब्येत महत्त्वाची आहे, तसेच माझ्यामुळे त्यांची राजकीय अडचण व्हावी, अशी ही माझी इच्छा नाही. राहिला प्रश्न त्यांच्या शुभेच्छांचा तर आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनातच वाढलो आणि घडलो आहोत. त्यांच्या शुभेच्छा माझ्या सोबत असतील.

प्रश्न : या निवडणुकीत तुम्हाला महत्त्वाचे कोणते मुद्दे वाटतात?

सत्यजित तांबे : आज बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. मुले शिकले आहे पण त्यांच्या हाताला काम नाही. नोकरीत संधी मिळत नाही. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा, कार्यकक्षेबाहेरील कामांचा बोजा. खासगी उद्योग व्यवसायांमध्ये स्थानिक तरुणांना डावलने आणि व्यावसायिक व सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या पदवीधर बांधवांचे थेट सरकार आणि प्रशासनाशी निगडित असलेले प्रश्न, सर्वच मुद्द्यांवर नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सरकार आणि पदवीधर यांच्यातील चर्चेचा दुवा म्हणून मला काम करायला आवडेल.

बेरोजगार तरुणांसाठी सरकारी खाजगी आणि व्यावसायिक संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यावर माझा भर राहील. वेळ पडली तर त्यासाठी स्वतंत्र फोरम उभा करण्याचीही माझी तयारी आहे. जुनी पेन्शन, शिक्षक भरती हे मुद्दे देखील महत्वाचे आहे. ते सोडविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. छत्तीसगढ, राजस्थान, हिमाचल येथील मुख्यमंत्र्यांना मी ओळखतो. त्यांनी जुनी पेन्शन योजना कशी राबवली याचाही आम्ही अभ्यास करू आणि शासनाला त्याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यायला बाध्य करू.

प्रश्न : राज्यात शिक्षक भरती खोळंबली आहे. या समस्येकडे आपण कसे पाहता? यावर नेमका काय तोडगा आहे.?

सत्यजित तांबे : राज्यात निव्वळ शिक्षक भरतीत खोळंबलेली नाहीये तर किमान साडेपाच लाख सरकारी पदे रिक्त आहेत. काही पदांच्या भरतीची शेवटची जाहिरात प्रसिद्ध होऊन अनेक वर्षे उलटून गेलेले आहेत. त्यामुळे प्रशासनावर ताण निर्माण होतो. सरकारी विभागांना पुरेसे मनुष्यबळ द्यायचे नाही आणि त्यांच्याकडून भरमसाठ अपेक्षा ठेवायच्या, हे सुद्धा अन्यायकारक आहे.

शिक्षक भरती बाबत देखील अशीच परिस्थिती आहे. राज्यात शिक्षकांच्या सुमारे एक लाख जागा रिक्त आहेत. पुरेसे शिक्षक नसल्यामुळे अनेक ठिकाणी गुणवत्ता ढासाळत आहे, अनेक डीएड, बीएड धारक तरुण-तरुणींनी खासगी शाळांमध्ये मिळेल, त्या पगारावर नोकरी स्वीकारलेली आहे. त्यामुळे सरकारी शाळा आणि खासगी शाळा अशी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली.

सरकारने नुकतीच तीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली, त्यासाठी शिक्षणमंत्र्यांचे अभिनंदन, आता ही घोषणा सत्यात उतरवण्यासाठी सरकारवर दबाव ठेवावा लागणार आहे. ही भरती पारदर्शक व गुणवत्तेवर होईल यासाठीही मी राज्यातील काही प्रमुख मंडळींना एकत्र घेऊन एक दबाव गट तयार करू इच्छितो, हा दबाव गट रिक्त शिक्षकांच्या शंभर टक्के जागा भरण्यासाठी सरकारला भाग पाडेल.

प्रश्न : अपक्ष निवडणूक लढल्याचा अनुभव कसा राहिला, मतदारांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला?

सत्यजित तांबे : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा मतदारसंघ डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या संघटन कौशल्याने बांधून ठेवलेला आहे. काँग्रेसहून इतर पक्षांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. असे असतानाही त्यांनी सर्वपक्षीय संबंध प्रस्थापित करत हा मतदारसंघ बांधला.

निवडून आल्यानंतरही त्यांनी कधीच कामे करताना पक्ष बघितला नाही. सर्वच विचारधारेचे लोक, संघटना, पक्ष हे डॉ. सुधीर तांबे यांना आपले मानतात. ते कोणत्याही एका पक्षाचे कधीच नव्हते ते सर्वांचेच होते. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढताना मला पक्षीय अडचणी जाणवत नाही.

प्रश्न : सुधीर तांबे यांचा वारसा तुम्ही पुढे नेत आहात, या जबाबदारी बद्दल काय सांगाल?

सत्यजित तांबे : माझे वडील नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी हा मतदारसंघ तळ हातावरील फोडाप्रमाणे जपला. १४ वर्षात त्यांनी तब्बल १५ लाख किलोमीटरचा प्रवास केला, ५४ तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये ते जाऊन आले. पदवीधरांच्या सतत संपर्कात राहिले, सहज उपलब्ध झाले आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला त्यांनी गांभीर्याने घेतले आणि तो सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

मतदार संघात त्यांची ओळख नेता नव्हे तर मित्र म्हणून झाली. अनेक राजकीय पक्षात त्यांनी मित्र जोडले. प्रश्न सोडवताना पक्षीय भेदाच्या पलीकडे जाऊन मदत केली. त्यांच्या प्रयत्नातून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले अनेक प्रश्न सुटले. त्यांनी उभे केलेले माणसांचे नेटवर्क आज माझ्या पाठीशी खंबीरपणे आणि सक्षमपणे आहे. त्यांचा हा समृद्ध वारसा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. त्यांनी निर्माण केलेले नाते जपणे आणि ते वृद्धिंगत करणे ही माझी जबाबदारी आहे असे मी समजतो. ‘सत्यजित तुमचा आहे आणि तो तुमच्यासाठी काम करेल’ हा शब्द मी या माध्यमातून मतदारांना देतो.

मागील १४ वर्ष माझ्या वडिलांचे काम या मतदारसंघाने बघितलेले आहे, त्यांची निष्ठा आणि तळमळ पाचही जिल्ह्यांनी अनुभवलेली आहे. त्यामुळे अपक्ष म्हणूनही माझ्या उमेदवारीला मोठे जनसमर्थन भेटलेले आहे. तब्बल शंभराहून अधिक संघटनांनी मला पाठिंबा देऊ केलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT