धुळे : शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते आणि दुभाजक वगळले तर महापालिका क्षेत्रातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांचे विस्तारीकरण झालेले नाही. जे काही सरासरी सात ते नऊ मीटरचे रस्ते आहेत, ते दुतर्फा अतिक्रमणांनी व्यापलेले आहेत. केवळ दूरदृष्टिकोनासह कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे शहरात पार्किंग आणि वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न जटिल झाल्याचा निष्कर्ष आहे. (Roads narrow in dhule for years tangle of problems due to sluggish word dhule municipal corporation Latest Marathi News)
शहरात चौफेर असा वर्दळीचा एकही रस्ता नाही की त्याच्या दुतर्फा अतिक्रमण नाही. सर्वत्र अतिक्रमणधारकांची संख्या वाढत असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही रस्त्यांचे दुभाजकांसह विस्तारीकरण केले.
त्यामुळे किमान वाहने जा- ये करू शकतात. परंतु, असे रस्तेही काही ठिकाणी अरुंद व अतिक्रमणांनी व्यापले असल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न उद्भवला आहे. यात महापालिका क्षेत्रातील अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची सतत कोंडी होत असते.
या स्थितीत पेठ भागातील गल्ल्या, पाटबाजार, बारापत्थर, ग्रामीण तहसील कार्यालय व तालुका पोलिस ठाण्याचा परिसर, नेहरू चौक, एल. एम. सरकार हायस्कूल परिसर, अंडाकृती बगीचा, मोठ्या पुलाजवळील अंडाकृती बगिच्याकडे जाणारा वळण रस्ता यासह शहरात ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीसह पार्किंगच्या समस्येने जटिल रूप धारण केले आहे.
महापालिका कायम सुस्त
खरे तर शहर सुधार आराखड्याप्रमाणे महापालिकेने काही सुयोग्य नियोजन केल्याचे दिसत नाही. कार्यक्षेत्रातील अरुंद रस्त्यांच्या विस्तारीकरणाचे नियोजन महापालिकेच्या अजेंड्यावर नाही.
तत्कालीन नगरपालिका व विद्यमान महापालिकेत अनेक पक्षांनी सत्ता मिळविली. मात्र, अशा नागरी समस्यांच्या सोडवणुकीपासून त्यांनी कायम पळ काढल्याने शहर बकाल स्थितीकडे वाटचाल करताना दिसते.
महापालिकेत कुठल्याही अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षाच्या लोकसेवकांनी किंवा आजी- माजी लोकप्रतिनिधींनी शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या, वाहन संख्येच्या तुलनेत अरुंद रस्त्यांच्या विस्तारीकरणाचा मुद्दा हाताळला नाही. केवळ मनधरणी व मतांच्या राजकारणामुळे त्यांनी शहराला वेठीस धरल्याचे मानले जाते.
परिणामी, शहर विकासाला व अशा प्रश्नांच्या सोडवणुकीला कधीही बिनचूक दिशा मिळू शकली नाही. अशाच अरुंद व वाहतुकीच्या कोंडी होणाऱ्या मार्गांवरून अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक वावरतात, मात्र त्यांचा आविर्भाव या स्थितीची काही देणेघेणे नाही, असाच दिसला आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही
महापालिका क्षेत्रात दूरदृष्टिकोनातून विकासाला दिशा देणे व नियोजनात्मक, रचनात्मक कार्याच्या उभारणीला अजूनही चांगला वाव आहे. शहराला बकाल स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय व सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. महापालिकेला मोठे अधिकार आहेत.
अधिकाऱ्यांनाही न्याय भूमिका वठविण्यासाठी विशेष अधिकार प्रदान आहेत. जनहिताचे प्रश्न सुटावेत म्हणून लोकप्रतिनिधींना निवडून दिले जात असते. या घटकांनी समन्वय, प्रामाणिक भावनेतून शहराला चांगली दिशा देण्याचे ठरविले तर काहीही अशक्य नाही.
ते लक्षात घेता भविष्यात अजगरी विळखा पडू नये म्हणून पार्किंग, वाहतुकीची कोंडी, अरुंद रस्ते, अतिक्रमणांसह हॉकर्स झोन, भाजी विक्रेते, पथारीवरील व लघुव्यावसायिकांसाठी शासकीय नियमानुसार मालकीच्या जागा वापरात आणून प्रश्न मार्गी लावावा, अशी धुळेकरांची माफक अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.