बल्लिया: भाजपने उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. आपले उत्पन्न दुप्पट झाले का, हे शेतकऱ्यांनी सांगावे. शेतकऱ्यांना खते मिळाली का, त्यांच्या पिकांची खरेदी हमीभावाने होते का, आदी सवाल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रचारसभेत बोलताना केले.
उत्तर प्रदेशातील सध्याची विधानसभा निवडणूक ही बल्लियातील मतदार विरुद्ध फसवणूक करणाऱ्यांदरम्यान असल्याचेही ते यावेळी म्हणाले. फेफणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. सत्ताधारी भाजपवरचा हल्ला तीव्र करताना अखिलेश यादव म्हणाले, की भाजपने आपल्याला कितीवेळा फसविले आहे, हे लोकांना चांगलेच माहीत आहे. भाजपने लोकांना इतक्या वेळा फसविले आहे, की ही निवडणूक बल्लिया वि. फसविणाऱ्यांमधील वाटत आहे. भाजपच्या मित्रपक्षांनाही भाजपचा हा खोटेपणा समजला आहे. बल्लियातील लोकांनी नेहमीच राजकारणाला नवी दिशा दिली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक सामान्य नसून ती घटना व लोकशाही वाचविण्यासाठी आहे. यात मी समाजवादी, आंबेडकरवाद्यांबरोबर सहभागी झालोय, याचा मला आनंद आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेवर आल्यास विकासाला चालना मिळेल. त्यातून शेतकऱ्यांची भरभराट होईल. युवकांना रोजगार मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.