तिवसा ( जि. अमरावती ) : गेल्या ४ डिसेंबरला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे प्रहारच्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दुचाकी मोर्चा काढता दिल्लीकडे रवाना झाले. मात्र, बच्चू कडूंची भूमिका दुटप्पी असून त्यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे. त्यांचे हे आंदोलन फक्त नाटक असल्याचा आरोप करत गुरुकुंज मोझरी येथील समाधी स्थळी तिवसा भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या शेतकरी भूमिकेचा निषेध म्हणून भाजपाने गुरुकुंज मोझरी येथे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर निषेध आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी केले. बच्चू कडू केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवीत असून महाराष्ट्र सरकाराने सत्तेत आल्यापासून कायम शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. २५ हेक्टर मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार होती. परंतु, मदत मिळाली नाही, दूध दरवाढ देण्यात आली नाही.
पावसामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले असताना तुटपुंजी मदत देण्यात आली. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू हे नाटकी आंदोलनाची भूमिका घेत आहेत, असा आऱोप यावेळी करण्यात आला. आधी राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्ही बच्चू कडू यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सरकार विरोधात घोषणा देत काळ्याफिती लावून निषेध नोंदविला. यावेळी निवेदिता चौधरी, शंतून देशमुख, अमित बाभूळकर, सागर सिंगाने, स्वप्नील भुयार, राजेश नेवारे, राजेश पाठक, प्रीतम वेरुळकर यासह समाधीस्थळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.