पिपरी पोहणा (जि. वर्धा) : वीज वितरण कंपनीकडून अनियमित वीजपुरवठा होत असल्याने चिंचोली (शिंगरु) येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतात असलेली वीजजोड़णी केवळ शोभेची वस्तू बनली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांवरसुद्धा कोरडवाहू शेती करण्याची वेळ आली आहे.
शेतपिकावर आलेल्या विविध रोगांमुळे शेतकरी त्रस्त असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. कापूस पिकांवर आलेल्या बोंडअळीमुळे अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्या नसल्याने सोयाबीन काढणीचाही खर्च निघत नाही. त्यामुळे उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. बोंड अळीमुळे कापूस पिकाचीसुद्धा तीच अवस्था झाली आहे. त्यामुळे बँकेचे व सावकारी कर्ज, शेतीवर झालेला खर्च यामुळे शेतकरी कर्जाच्या दरीत ढकलला जात आहे. वर्षभर जगण्यासाठी केवळ गहू व चणा याच शेतपिकांचा आधार राहिला आहे. परंतु, हे पीक होण्यासाठी ओलिताची व्यवस्था असणे आवश्यक आहे. चिंचोली (शिंगरु) चिकमोह या गावांना लागून वेणा नदी वाहत असल्याने अनेक शेतकरी बागायती शेती करतात. परंतु, वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाने विजेचा लपंडाव सुरू आहे. यंदा जिल्ह्यातील जलाशये, तलाव तुडुंब भरले असून विहिरींना मुबलक पाणी आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर आहे. पण महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. बागायतदार शेतकऱ्यांवरसुद्धा कोरडवाहू शेती करण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
निवेदनांना केराची टोपली -
या सर्कलचे पं. स. सदस्य आशीष पोटकर, सरपंच दिलीप राऊत ,पत्रकार अरुण बोबडे, उपसरपंच भास्कर बुरंगे, नंदश्री माळवे, बबन बोबडे यांनी निवेदनाद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्याची अनेकदा मागणी केली. परंतु, निवेदनाला केराची टोपली दाखविली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.