भंडारा : गोसेखुर्द धरणात पाणी अडविण्यात आल्यापासून नदीपात्रातील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण सतत वाढत आहे. आता या पाण्यातील जीवजंतूतही हानिकारक घटक आढळून येत असल्याने या भागातील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे येथे मासेमारीला परवानगी नाकारली जात आहे. परंतु, या घातक तत्वामुळे मानवी आरोग्यावरील दुष्परिणामाबाबत प्रशासकीय पातळीवरून चुप्पी साधली जात आहे.
वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द धरणात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाणी अडविले जात आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात दूरवरपर्यंत बॅकवॉटर साचले आहे. आंभोरा परिसरात वैनगंगेला मिळणाऱ्या कन्हान नदीवाटे नागपूरच्या नागनदीचे सांडपाणी व दूषित पाणी येते. धरणात सतत पाण्याचा साठा वाढविण्यात येत असल्याने नदीच्या पात्रात उन्हाळ्यात जलपर्णी वनस्पतीची वाढ होते. नदीतील पाणी पिण्यास अयोग्य असून त्यात घातक रासायनिक घटक असल्याचा अहवाल आधीच दिला होता. आता या पाण्यातील मासोळ्यांत कॅडमियम हा घटक प्रमाणापेक्षा अधिक वाढल्याचा अहवाल प्रयोगशाळेने मत्स्य विभागाला दिला आहे. त्यावरून विभागाने कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. मात्र, गोसेखुर्द धरणाच्या पाण्यात पिंजरा पद्धतीने मत्स्य संगोपन व मासेमारीसाठी पाच प्रकल्पांना परवानगी दिली होती. ते प्लांट आता पेंच प्रकल्पात हलविण्यात आले, अशी माहिती येथील मत्स्यविकास अधिकारी एम. एस. चांदेवार यांनी दिली आहे. यावरून वैनगंगेतील मासोळ्यांमुळे नागरी आरोग्य धोक्यात येऊ शकते यात वाद नाही. याबाबत भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून या भागातील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ढिवर बांधवांचा रोजगारही गेला
वैनगंगेतील मासोळ्यात घातक घटक आढळल्यामुळे येथे मोठे प्लांट पेंच प्रकल्पात हलविण्यात आले. परंतु, या नदीच्या काठावरील गावांत ढिवर समाजाची बरीच मोठी लोकवस्ती आहे. त्यांना दिवसा मासेमारी करून मासोळ्यांची विक्री केल्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीविका करता येते. मात्र, विभागाचे अधिकारी त्यांच्या मासेमारीला अवैध ठरवितात. येथे मासेमारीसाठी परवानगी दिली जात नाही, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे धरणात ढिवर बांधवांचे गाव तर आधीच गेले आहे. आता रोजगारही धोक्यात आला आहे.
पाणी पिण्यास अयोग्य
गोसेखुर्द धरणात पाणी अडविण्यात आले. तेव्हापासून कन्हान नदीद्वारे येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून नंतर नदीत सोडावे अशी मागणी केली आहे. या नदीचे पाणी पिण्यास अयोग्य असूनही अनेक गावांना तेच पाणी प्यावे लागत आहे. मासोळ्यांत घातक घटक आढळण्याचे मुख्य कारण दूषित पाणी हेच आहे.
प्रकाश पचारे
जिल्हाध्यक्ष, जिल्हा मासेमार संघ, पवनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.