नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणूक १२ तालुक्यांमध्ये दोन टप्प्यांत ९२० मतदान केंद्रावर घेण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा घातपात न होता, शांततेत संपन्न झाली. त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली जिल्हा पोलिस विभागाचे विशेष कौतुक केले आहे.
हेही वाचा - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा
गडचिरोली हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून परिचित आहे. नक्षली निवडणुकांच्या काळात घातपाती कारवाया करत असतात. पण त्यावर मात करून गडचिरोली पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकी शांततेत होण्याचा विक्रम झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीचा पहिला टप्पा १५ जानेवारी व दुसरा टप्पा २० जानेवारी रोजी पार पडला. पहिल्या टप्प्यात ८२.०६ टक्के, तसेच दुसऱ्या टप्प्यात ८०.०१ टक्के असे विक्रमी मतदान झाले. यात पुरुषांचे मतदान ७४.३७ टक्के, तर महिलांचे मतदान ८१.१९ टक्के आहे. हे पाहता गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी विचारसरणीचा अंत होत आहे, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील १७७ व संवेदनशील ३७७, तसेच सामान्य ५२७ अशा निवडणूक बुथवर मतदान प्रक्रियेचे साहित्य, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना पोहोचवले. यासाठी त्यांनी ३६७ बूथवर पोहोचण्यासाठी जंगलातून ३१४६ किलोमीटरचा पायी प्रवास केला, तर १२२ अतिसंवेदनशील बुथवर हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षीतपणे पोहोचविले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहासंचालक संदीप पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाने नियोजनात्मक पद्धतीने कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मतदान शांततेत पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा - केंद्रीयमंत्री गडकरींनी काढले नगरसेवक, आमदारांचे चिमटे; म्हणाले, जबाबदारी कुणाची आणि काम करतेय कोण
जवेलीत ५४ वर्षानंतर निवडणूक -
नक्षलदृष्ट्या दुर्गम- अतिदुर्गम व नक्षल बहुल आदिवासी भागात यापूर्वी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेच नव्हते. असेच एक गाव मौजा जवेली बुद्रक. या गावात ५४ वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. नक्षलवाद्यांच्या भितीला न जुमानता लोकांनी भरभरून मतदान केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.