नागपूर : पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या ५२ शिक्षकांचे समायोजन इतरत्र करण्यात आले. विशेष म्हणजे पटसंख्या कमी असतानाही यातील काही शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून होते.
हेही वाचा - आता सर्व उपग्रहांची स्थिती माहिती करणे होणार शक्य, नागपुरातील विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया
जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, शिक्षण सभापती भारती पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते. समुपदेशानातून समायोजन करण्यात आले. सीताबर्डी येथील पटवर्धन शाळेत २ विद्यार्थी असतानाही सहा शिक्षक कार्यरत होते, तर अनेक शाळेत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक संख्या कमी आहेत. काही शाळांमध्ये भाषा, गणित, विज्ञान विषयाचे शिक्षकच नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना गरज असलेल्या शाळांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मध्येच समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली.
'त्या' शिक्षकांना इतर जिल्ह्यात पाठविणार -
पटवर्धन व काटोल कन्या शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या १४ माध्यमिकच्या शिक्षकांना प्राथमिक विभागातील शाळांमध्ये समायोजित करण्यात आले. याला काही शिक्षकांनी विरोध दर्शविला. प्राथमिकच्या शाळांमध्ये न गेल्यास इतर जिल्ह्यात समायोजित करण्यात करण्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.