नागपूर : लहान मुलांची खेळणी हिसकल्यानंतर जशी मुलांची अवस्था होते, तशीच अवस्था सध्या मोबाईल गेम पब्जी बंद झाल्यामुळे झाली आहे. मुले ‘वेडी’ झाल्यामुळे घरात धिंगाणा घालणे, तोडफोड करणे, हट्टीपणा करणे किंवा रडरड करणे, असे प्रकार वाढले आहेत. काही मुले चक्क नैराश्यात गेली असून पालकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात पब्जी गेमवर बंदी आणली. भारतात तब्बल ३ कोटींपेक्षा जास्त मुले-युवक पब्जी हा गेम मोबाइल किंवा संगणकावर खेळता. पब्जी खेळत असताना त्यांना कसलेही भान राहात नाही. त्यामुळे घरात किंवा आजुबाजुला काय सुरू आहे, याकडेही त्यांचे लक्ष नसते. त्यामुळे त्यांच्या पालकांना मुलांच्या अशा वागण्याचा खूप त्रास सहन करावा लागतो.
‘पब्जी लव्हर’ तरुणांनी फेसबूक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे तरूण पब्जी खेळत नाहीत, त्यांनी मात्र सोशल मीडियावर पब्जी बाबत हास्यास्पद मिम्स टाकले आहेत. ‘आपल्या गल्लीत जर नवीन मुले-मुली भटकताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. पब्जी बंद झाल्यामुळे ते रिकामचोट झाल्याने बाहेर निघाले आहेत, असे समजावे.’
‘पब्जी बंद झाल्यामुळे मला बेरोजगार झाल्याची भावना निर्माण झाली आहे.’ पब्जी बंद, मग काय मोबाईलचा उपयोग आम्ही गर्लफ्रेंडशी बोलायलाच करावा का, ‘काय केले होते आमच्या पब्जीने, शाळा नाय अन् ट्युशन नाय...आता काय आम्ही मंदिरात जाऊन टाळ कुटावे काय?’ अशा अनेक प्रतिक्रिया फेसबूक आणि वॉट्सॲपवर आल्या आहेत.
पब्जी बंद झाल्याचा सर्वाधिक आनंद महिलांना झाला आहे. मुले तासनतास पब्जी किंवा टीकटॉक खेळत असल्याने त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. हे पालकांना कळून चुकले होते. आता योगायोगाने या दोन्हींवर बंदी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पब्जीत नेक्स्ट स्टेप न गाठता आल्याने गेल्या ८ महिन्यात नागपुरात १६ युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये ७ शाळकरी व महाविद्यालयीन मुलींचा समावेश आहे. रितिक किशोर ढेंगे (वय २०, जुना फुटाळा, अंबाझरी), शुभम लालाजी यादव (वय २४, रा. रमाईनगर, नारी रोड, कपिलनगर), साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय १९, रा. श्यामनगर, हुडकेश्वर रोड, नागपूर), अर्पिता रजत गुप्ता (वय १९, रा. साईबाबानगर, आणि फारीया निजाम पठाण (वय १९, रा. भोजापूर) यांनी चक्क पब्जीमुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.
मोबाईलवरील गेम्स भावनिक जाळं निर्माण करून त्यांचा वास्तवाशी संपर्क तोडून टाकतात. त्यामुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडते. भावनेच्या भरात तो अपघातांना बळी पडतो. त्याला दुसरे कामं सांगितल्यास चिडचिड करतो. त्यामुळे पालकांनी मुलांना अशा गेम्सपासून लांब ठेवावे. मुलावर मानसिक परिणाम होऊ नये म्हणून पालकांनी योग्य काळजी घ्यावी.
- डॉ. राजा आकाश,
मानसोपचार तज्ज्ञ.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.