गिरड (जि. वर्धा) : वन्यप्राण्यांनी शेतपिकांचे नुकसान केल्यास वन विभागाच्या वतीने नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, मूल्यांकन आणि पंचनामा करणाऱ्या समितीत समाविष्ट असलेले अधिकारी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांना वन विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे शेतपीक नुकसानाचा पंचनामा करण्यात पंचाईत निर्माण होत आहे. शेतकरी मात्र हैराण झाले आहेत.
वन्यप्राण्यांनी शेतपिकांचे नुकसान केल्यास वनाधिकारी, कृषी सहायक, तलाठी आणि गावातील सरपंच यांच्या समक्ष शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी करून अहवाल सादर करण्याची तरतूद आहे. मात्र, शेतकऱ्यांनी वन विभागात नुकसानाचा अर्ज केल्यावर कृषी सहायक आणि तलाठी मिळतीलच असे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित विभागाच्या कार्यालयात उंबरठे झिजवावे लागते. परिणामी अधिकारी वेळीच उपलब्ध होत नसल्याने नुकसानभरपाईचे प्रकरण प्रलंबित असते. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बरेचदा "मी कामात आहे. प्रकरण घेऊन या. सही करून देतो', अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळतात. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या नुकसानाची पाहणी प्रत्यक्ष केली जात नाही. ही शोकांतिका आहे.
वन्यप्राण्यांनी पीक नुकसान, पशुधन नुकसान किंवा मनुष्यहानी केल्यास नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र, या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी विविध शर्तींची कसोटी द्यावी लागते. वन कार्यालयात नुकसानाचे प्रकरण दाखल केल्यावर तलाठी आणि कृषी सहायक प्रत्यक्ष शेताची पाहणी करण्यास येत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बरेचदा या समितीत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा एकत्र येण्याचा योगायोग जुळून येत नसल्याने आठवडा लोटूनही पंचनामा होत नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शिवाय या कायद्यात समाविष्ट तरतुदीत बदल करण्याची गरज असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
माझ्या शेतात वन्यप्राण्यांनी कापूस पिकाची नासाडी केली. मी पाच दिवसांपूर्वी वन विभागाकडे अर्ज केला; मात्र तलाठी गैरहजर असल्याने अद्याप नुकसानाचा पंचनामा केलेला नाही. वेळीच नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केल्यास अधिकाऱ्यांना कळेल. मात्र, संबंधित अधिकारी यांच्यातच ताळमेळ बसत नसल्याने वारंवार येरझारा मारव्या लागते. यामुळे नाहक त्रास होतो.
-शकील पठाण, शेतकरी, फरीदपूर
शेतकऱ्यांकडून आमच्याकडे अर्ज प्राप्त होताच आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सहपत्र पाठवितो. मात्र, कृषी सहायक आणि तलाठी वेळीच उपलब्ध होत नसल्याने याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होतो. या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळविलेली आहे.
-नरेंद्र दर्वे, कार्यालयीन कर्मचारी, वन कार्यालय, गिरड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.