विदर्भ

केवळ कोळशाच्या भरोशावर किती दिवस ‘काॅलर टाईट’ करणार?

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर म्हटले की उद्योनगरी असे चित्र (Chandrapur district) डोळ्यांपुुढे येते. कोळसा खाणी आणि सिमेंट कारखान्यांचे परिसर बाहेरून न्याहाळताना गदगदून आल्यासारखे वाटते. त्याची छाप अशी पडते की, हे तर जणू उद्योगाचे माहेरघर. परंतु, वस्तुस्थिती खूपच वेगळीच दिसते. चंद्रपूरच्या ग्रामीण भागात आता फार उद्योग दिसतच (The industry is not visible) नाहीत. जंगल, खनिज संपत्ती, मुबलक पाणी असल्याने आधी मोठ्या प्रमाणात उद्योग होते. त्यामुळे उद्योगनगरी अशी ओळख मिळाली होती. मात्र, काही वर्षांत बँकांचे असहकार्य, व्यवस्थापनातील अंतर्गत वाद, उद्योगातील राजकीय शिरकाव, युनियनबाजी आणि शासनाचे उद्योगांप्रती असलेले उदासीन धोरण यामुळे उभारले गेलेले उद्योग धडाधडा बंद पडत गेले. (Unemployment-destroys-Chandrapur-district,-migration-of-laborers-to-Madhya-Pradesh-and-Chhattisgarh)

एमआयडीसी क्षेत्रात संपादित झालेल्या अर्ध्याअधिक जमिनीवर उद्योगच उभारले नाहीत. जमिनींचा वापर दुसऱ्याच कामासाठी होऊ लागला. मल्टी आर्गनाईज सोडला तर एकही मोठा उद्योग नाही. दाताळा आणि ताडाळी एमआयडीसी परिसरातील सत्तरेक उद्योग अलीकडेच बंद पडले. त्यामुळे शेकडो नव्हे तर हजारो लोक बेरोजगार झाले. राजकारण, समाजकारण, उद्योग यांसह अनेक क्षेत्रात जिल्ह्यात बड्या हस्ती आहेत. परंतु, जिल्ह्यातील उद्योगांना नवजीवन देण्यासाठी आणि नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न होताना दिसत नाही.

केवळ कोळसा खाणी, वीज प्रकल्प आणि सिमेंट कारखाने दाखवत बडे लोक आपली ‘काॅलर टाईट’ करून घेतात. अर्थपूर्ण व्यवहाराचे काळे घोडे नाचविण्यातच बड्यांना ‘इंट्रेस्ट’ दिसतो. चंद्रपूर जिल्हा बेरोजगारीने पोखरत चालला याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. रोजगाराच्या शोधात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडकडे स्थलांतर वाढले आहे. उद्योगाविषयी कुणी विषय काढलाच तर ‘हो हो’ म्हणत ‘देखल्या देवा दंडवत’ एवढेच सोपस्कार उरकवले जात आहेत.

कधीकाळी उद्योगांचा सुवर्णकाळ

१९७९ मध्ये चंद्रपुरात एमआयडीसीची स्थापना झाली. स्थापनेनंतर दाताळा परिसरात सर्वप्रथम मल्टी आॅर्गेनिक उद्योग सुरू झाला. एमआयडीसी परिसरात याच उद्योगाने मुहूर्तमेढ रोवली. तीन वर्षांच्या काळात या भागात अनेक छोटे-मोठे उद्योग आले. त्यात प्रामुख्याने मंगलूर केवलू फॅक्टरी, इन्स्टंट पाइपच्या चार प्रकल्पांचा समावेश होता. एकापाठोपाठ एक असे अनेक उद्योग या भागात आल्याने रोजगारनिर्मिती वाढली. १९८१ ते ८५ या काळात रेमंड स्टील, हिंदुस्थान लिव्हर, जॉली बोर्ड यांसह अन्य उद्योग येथे येण्याच्या तयारीत होते. मात्र, याच काळात औद्योगिक क्षेत्रात राजकीय पक्षांचा शिरकाव झाला. युनियन स्थापन झाले. त्यांच्यातील वाद बघून येणाऱ्या उद्योगांनी आपले पाय मागे घेतले आणि तेथूनच उद्योगांची अधोगती सुरू झाली.

राजकारणामुळे उद्योजकांचा काढता पाय

ताडाळी येथील एमआयडीसीची जागा स्टील उद्योगांसाठी देण्याचे नियोजन केले होते. मात्र, येथील अंतर्गत राजकारण बघता स्टील उद्योग आलेच नाही. त्यामुळे येथील जागा खासगी वीजनिर्मिती प्रकल्पांना देण्यात आली. त्यानुसार ताडाळीत सहा ते सात खासगी वीजनिर्मिती प्रकल्प आले. मात्र, त्यामुळे प्रदूषण वाढले. काही वर्षे खासगी वीजनिर्मिती प्रकल्प सुरळीत सुरू होते. मात्र, वीजनिर्मितीसाठी कच्चा मालाला लागणाऱ्या सबसिडीबाबत शासनाने आखडता हात घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांत खासगी वीजनिर्मिती प्रकल्पही बंद पडले. स्पाँज आर्यनचेही चार उद्योग येथे आले; मात्र ते काहीच काळ तग धरू शकले. एमआयडीसीत अनेकांनी उद्योग सुरू करण्यासाठी जमिनी घेतल्या; मात्र या जमिनीवर एकही उद्योग सुरू झाला नाही. तसे प्रयत्नही होताना दिसत नाही.

चंद्रपूर जिल्हा मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करणारा जिल्हा आहे. असे असताना येथील वीज महाग आहे. त्यामुळे या भागात येणारे उद्योग शेजारच्या राज्यात जात आहेत. येथे येणाऱ्या उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देणे आवश्यक आहे. येथे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या ठिकाणी छोट्या उद्योगांना काम मिळावे. असे झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील. येथे कोळसा, स्टील, विजेवर आधारित उद्योग आहेत. मात्र यामुळे प्रदूषण वाढत आहे. प्रदूषण न होणारे उद्योग या भागात यावे. त्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू.
- किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
जिल्ह्यात जंगल, पाणी, कोळसा, रेल्वे सुविधा आहे. तरीही नवीन उद्योग येत नसतील तर विचार करण्यासारखी बाब आहे. चंद्रपुरात येणाऱ्या उद्योगांसाठी राज्य शासनाने चांगले धोरण आखून उद्योजकांना सहकार्य करावे. जिल्ह्यातील अनेक मोठे उद्योजक दुसरीकडून कच्चा माल आणतात. वास्ताविक हा कच्चा माल चंद्रपुरात तयार होतो. मोठ्या उद्योगांनी येथील छोट्या उद्योगांकडून कच्चा माल घ्यावा. बँकांनी सुलभ पद्धतीने कर्ज देण्याची पद्धत अवलंबावी. शेतीवर आधारित उद्योगांना सबसिडी द्यावी. एमआयडीसीत अनेकांनी जमिनी विकत घेतल्या. मात्र, त्यावर कोणतेच उद्योग सुरू केलेले नाही. त्या जमिनी ताब्यात घ्याव्या.
- मधुसुदन रुंगठा, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन, चंद्रपूर

(Unemployment-destroys-Chandrapur-district,-migration-of-laborers-to-Madhya-Pradesh-and-Chhattisgarh)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT