केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 'आयुष्मान भारत' योजनेंतर्गत होणार कोरोनाचा उपचार!

Ayushman-Bharat-Yojana
Ayushman-Bharat-Yojana

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तपासणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजनेंतर्गत करण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.

यामुळे नागरिकांना कोरोनाची तपासणी आणि उपचार हे खाजगी दवाखान्यातही करता येणे शक्य झाले असून याचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. याचा फायदा देशभरातील करोडो नागरिकांना होणार आहे. या निर्णयामुळे गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांना उपचाराची सुविधा उपलब्ध होणार असून सरकारी दवाखान्यांवरील ताणही यामुळे कमी होणार आहे. 

कोविड-१९ म्हणजे कोरोना व्हायरसची तपासणी आणि उपचार सरकारी दवाखान्यात मोफत करण्यात येत आहेत. आता त्याला खासगी दवाखान्यांची जोड मिळणार आहे. त्यामुळे गरीब लोकांना सरकारी दवाखान्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा थेट खासगी दवाखान्यात उपचार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह जेवढा खर्च येईल, तो सर्व खर्च सरकार उचलणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणचे सीईओ डॉ. इंदू भूषण यांनी दिली. 

सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होत असताना खासगी हॉस्पिटलमध्ये मात्र यासाठी ४५०० रुपये आकारले जात आहेत. हा खर्च गरीब रुग्णांना परवडण्यासारखा नाही. जर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली तर सरकारी हॉस्पिटलवरचा ताणही वाढणार आहे. त्यामुळे आयुष्मान भारत योजनेमध्ये कोरोनाची तपासणी आणि उपचार या दोन्हींचा समावेश करण्यात आला आहे. 

आयुष्मान योजनेत कोरोना समाविष्ट करण्यात आल्यामुळे केंद्र सरकारवर किती आर्थिक दबाव पडणार आहे, याचे स्पष्ट आकलन अजून झालेले नाही. कोरोनासारख्या महामारीमुळे आणखी किती नुकसान होणार आहे, याचा अंदाज आपण सध्या लावू शकत नाही. भविष्यकाळात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, तर खर्च वाढणार आहे, असे डॉ. इंदू भूषण यांनी यावेळी स्पष्ट केले. 
आयुष्मान भारत ही मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. जी गरीब वर्गातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली. या योजनेंतर्गत वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण नागरिकांना मिळते. त्यामुळे या योजनेचा लाभ देशभरातील करोडो लाभार्थींना होणार आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रविवारी वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत ३३७४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३० टक्के लोक हे तबलिगी जमातीच्या संपर्कात आले होते, असे म्हटले जात आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा यशस्वी सामना करत २६६ लोक बरे झाले असून काहींना घरी सोडण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com