मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना ठाकरे गटाला पक्षाची नव्याने बांधणी करण्याबरोबरच उमेदवार जाहीर करताना देखील दमछाक झाली आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सर्वाधिक २२ जागा पटकावून मोठा भाऊ होण्याचा मान देखील शिवसेनेने मिळवला आहे. अर्थात महाविकास आघाडीतील तीव्र नाराजी देखील मोबदल्यात त्यांना मिळाली आहे.
निष्ठावंत आजी माजी खासदारांना पुन्हा संधी देताना निवडणुकीत पहिल्यांदाच उभे राहण्याची संधी मागणार्यांच्या गळ्यातही शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माळ टाकली आहे. मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने मिळवले आहेत. त्यापैकी मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई वायव्य हे मतदारसंध शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही जिंकले होते. त्यापैकी मुंबई दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, ती कायम राहिली आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने ठाकरेंचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबई वायव्य मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचे पुत्र असलेले अमोल कीर्तिकर कथित खिचडी घोटाळ्यामुळे चर्चेत आहेत. ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला आहे. चौकशी दरम्यान अमोल कीर्तिकरांवर ईडीने कारवाई केली तरी शिवसेना त्यांच्या मागे उभी असून उमेदवार बदलला जाणार नसल्याची ग्वाही ठाकरे गटाने दिली आहे. काँग्रेसने रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा केल्याने ईशान्य मुंबई हा मतदारसंघ देखील शिवसेना ठाकरे गटाने पटकावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून २०१९ मध्ये खासदार झालेले संजय दिना पाटील हे मधल्या काळात शिवसेना ठाकरे गटात गेले होते. त्यांना या निमित्ताने पुन्हा संधी मिळाली आहे.
मराठवाड्यातील संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना संधी दिली आहे. खैरे यापूर्वी चारवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. २०१९ मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी त्यांचा पराभव केला होता. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही खैरे ठाकरेंची पाठराखण करत होते. संभाजीनगरमधून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील इच्छुक होते, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात ठाकरेंना यश आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून येतो. मात्र छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसमधून लढविण्याची तयारी दाखवल्याने ठाकरे गटाने त्यांच्यासाठी ही जागा सोडली. मात्र त्याबदल्यात कॉँग्रेसच्या पारंपरिक सांगली मतदारसंघावर दावा केला. आघाडीमध्ये चर्चा सुरु असताना ही जागा ठाकरे गटात नव्याने प्रवेश केलेले चंद्रहार पाटील यांना जाहीर करण्यात आली. सांगलीमध्ये त्यावरुन मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सांगली परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी आज दिल्लीवारी केली आहे.
कोकणात ठाकरेंचा विश्वास जुन्यांवर...
शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्या कोकणात ठाकरेंनी अजिबात नवीन प्रयोग न करता आपल्या जुन्या शिलेदारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा पराभव केला होता. मात्र त्यापूर्वी चार वेळा अनंत गीते शिवसेनेकडूनच लोकसभेवर निवडून गेले होते. विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गमधून संधी मिळाली आहे. यापूर्वी ते दोनदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. भाजपचे नेते नारायण राणे यांना विनायक राणे यांनी कोकणात मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी देत ठाकरेंनी जुन्या नेत्यांवर विश्वास दाखवला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.