Lockdown : १५ एप्रिलनंतर रेल्वे चालू होणार? रेल्वे प्रशासन म्हणाले...

Railway
Railway

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण भारतातील प्रवासी रेल्वेसेवा ठप्प आहे. नागरिकांना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेत व्हावा, यासाठी माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या सध्या रुळांवरून धावताना दिसत आहेत. येत्या १४ एप्रिलला लॉकडाऊनची मुदत संपणार असल्यामुळे प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू होणार का? याबाबतचे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. सोशल मीडियातही याची चर्चा होत आहे. 

यावर आता खुद्द रेल्वे प्रशासनाने आपला निर्णय जाहीर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने लॉकडाऊन संपेपर्यंत प्रवासी रेल्वे सुरू करण्यात येणार नाही, असे जाहीर केले. सध्या या संदर्भात केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच लॉकडाऊननंतर कोणत्या सेवा सर्वप्रथम सुरू होणार आहेत, याबाबतही काही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे पुढील निर्णय येईपर्यंत प्रवासी रेल्वेसेवा बंद राहील. याविषयी जो काही निर्णय होईल, तो तत्काळ जाहीर करण्यात येईल, असेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

सध्या विविध माध्यमांत रेल्वे सुरू होणार की नाही, याविषयीची चर्चा सुरू आहे. रेल्वे प्रवासाबाबत केंद्र सरकारने कोणताही प्रोटोकॉल जारी केलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयानंतर संबंधित विभागांना तशा सूचना देण्यात येतील, अशा आशयाचं ट्विट रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वेतर्फे नवा प्रोटोकॉल तयार करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये दाखविले जात आहे. या प्रोटोकॉलनुसार प्रवाशांना काही तास अगोदर रेल्वे स्थानकावर पोहोचणे आवश्यक असून त्याठिकाणी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत रेल्वेसेवा बंद ठेवण्यात येईल, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. लॉकडाऊन हटविण्याबाबत आणि वाढविण्याबाबत अशा दोन्ही बाजूंनी सध्या केंद्रीय स्तरावर चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत अजूनही कोणता ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील निर्णय येईपर्यंत प्रवासी रेल्वे वाहतूक बंद राहील, हे निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com